चिपळूण : शहरातील गोवळकोट कदम बौद्धवाडी येथील १५ कुटुंबियांचा पुर्नवसानाचा प्रश्न अद्यापही जैसेथेच आहे गेल्यावर्षी घरांवर दरड कोसळेल या भीतीमुळे येथील 15 कुटुंबियांना स्थलांतरीत करण्यात आलं. वर्षभरात पुर्नवसन करू असं आश्वसान प्रशासनाने दिलं होतं. मात्र अद्याप पुर्नवसनाचा प्रश्न तसाच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारी काम आणि बारा महिने थांब अशी म्हण प्रचलित आहे. मात्र याच म्हणीचा प्रत्यय चिपळूणमधल्या गोवळकोट इथले कदम बौद्ध वाडीतील नागरिक घेतायत. गेल्या वर्षी याच वाडीतल्या १५  कुटुंबीयांच्या घरावर दरड कोसळेल म्हणून ती सील करण्यात आली होती. शासनाकडून पुनर्वसन करण्यात येईल असं आश्वासनही दिलं आणि त्यांचं स्थलांतर गोवळकोट इथल्या प्राथमिक शाळेत करण्यात आलं. 


गेलं वर्षभर ही १५ कुटुंब याच ठिकाणी राहतायत. आता पुन्हा पावसाळा सुरू झालाय. त्यामुळे पुनर्वसन नेमकं कधी होणार असा प्रश्न गावक-यांनी विचारलाय. विशेष म्हणजे या सगळ्या कुटुंबीयांचं पुनर्वसन करायचं कुठं हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. 


या सगळ्या कुटुंबीयांना ज्या गोवळकोट इथल्या शाळेत आणून ठेवलंय त्या शाळेची अवस्था अशी दयनीय झालीय. जागोजागी गळती सुरूय. बांधकामही ढासळू लागलंय. त्यामुळे इथं राहणं धोकादायक आहे. त्यातच पावसाळ्यात कायम ओलावा राहत असल्यामुळे आजारांनाही निमंत्रण दिलं जातंय. तर कायमस्वरूपी पुर्नवसन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं तहसीलदारांनी सांगितलंय. 


पावसाळा संपेपर्यंत पुर्नवसानाचा प्रश्न सोडवला नाही तर घरांचं सील तोडून रहायला जाण्याचा इशारा इथल्या ग्रामस्थांनी दिलाय. आणि त्यानंतर एखादी दुर्घटना घडली तर त्याला शासन जबाबदार राहील अशी भूमिकाच आता इथल्या ग्रामस्थांनी घेतलीय.