Pune News Today: महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मराठवाडा, पुणे, विदर्भात मुसळधार पाऊस बरसत आहे. पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही ठिकाणी विजेच्या कडकडांसह पाऊस सुरू आहे. दौंड तालुक्यातील दापोडी येथे विजेचा धक्का लागल्याने पती-पत्नीसह मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज  सकाळी सात वाजण्याच्या आसपास घडली आहे. दरम्यान, केवळ बाहेर गेल्याने मुलगी वैष्णवी या दुर्घटनेतुन बचावली गेली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनील देविदास भालेकर (वय 45 वर्षे), पत्नी आदिका भालेकर (वय 38 वर्षे) व त्यांचा लहान मुलगा परशुराम भालेकर (वय 19 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. सोलापूर जिल्ह्यातुन दौंड तालुक्यातील दापोडी येथे पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या भालेराव कुटुंबावर काळाने झडप घातली असून यात सोन्यासारखं कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे.


सुनील यांचे कुटुंब पत्र्याची खोलीत राहत होते. राहत्या घरातील तारेला विद्युत प्रवाह उतरल्याने सुनिल हे अंघोळसाठी जात असताना कपडे टाकायच्या तारेवर टॉवेल टाकत असताना त्यांना विजेचा धक्का बसला. त्यामुळे पत्नी आणि मुलगा वाचवण्यासाठी गेले असता त्यांना ही विजेचा धक्का बसला आणि या तिघांचाही जागीच मृत्यू झाला.


मुलगा परशुराम हा केडगाव येथील जवाहरलाल विद्यालयात बारावीत शिकत होता. तर मुलगी वैष्णवी ही बाहेर गेली होती, त्यामुळे सुदैवाने ती या दुर्घटनेतून वाचली गेली. मागील पाच वर्षांपासून हे कुटुंब याठिकाणी राहत होते. घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक प्रविण संपागे, महावितरण वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. एकाच कुटुंबीयातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


 हिंगोली जिल्ह्यात वीज पडून शेतकरी दगावले


हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आहे. सेनगाव तालुक्यातील सिनगी खांबा या गावातील तीन शेतकऱ्यांवर वीज पडली, यामध्ये 60 वर्षीय वामन लोंलर या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत, शेतात हळद लागवड करीत असतांना अचानक आलेल्या पावसात वीज कोसळल्याने ही घटना घडली आहे.