Uddhav Thackeray: देश आणि राज्य अस्थिर करण्याचा यांचा कुटीव डाव आहे अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपा (BJP) आणि शिंदे गटावर (Shinde Faction) केली आहे. तसंच टेक्सटाईल कमिशनरचं ऑफिस राज्याबाहेर दिल्लीला जात असल्याची माहिती मिळत असल्याचा दावाही केली आहे. उद्धव ठाकरे आज विधानभवनात पोहोचले होते. यावेळी त्यांनी शेतकरी मोर्चा, सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अशा अनेक मुद्यांवर भाष्य केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरेंनी यावेळी शेतकरी मोर्चा आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीला आमचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. अन्नदाता आक्रोश करत असताना सरकारला मात्र त्यांच्याशी चर्चा करायला वेळ नाही. त्यांचं समाधान करणं गरजेचं आहे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. 


सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीला आमचा पाठिंबा 


"सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. महाशक्ती असणारं केंद्र सरकार पाठीशी असताना हे ओझं पेलण्यास काही हरकत नसावी. जगातील सर्वात ताकदवान लोक तिथे असताना सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत. 2005 पर्यंत ही योजना सुरु होती. निवृत्तीनंतरच आयुष्य जगायचं असेल तर या नवीन योजनेत काही मिळत नाही. न ऐकताच प्रश्नांचे डोंगर उभे करणार असाल तर प्रशासन नेमकं काय करत आहे?," अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. 


"पंचामृत म्हणजे कोणालाही पोटभर देणार नाही"


"अर्थसंकल्पात पंचामृत असं गोड नाव देण्यात आलं. पंचामृत म्हणजे पूजेनंतर हातावर पळीने टेकवतात. त्याच्याने काय पोट भरलं जात नाही. कोणालाही पोटभर देणार नाही, हातात जेवढं पडेल त्यावर पोट भरा आणि डोक्यावर हात फिरवा असा त्याचा अर्थ आहे. असा विचित्र अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. पंचामृताचे काही थेंब सरकारी कर्मचाऱ्यांवर उडवायला हरकत नव्हती," असा टोलाही त्यांनी लगावला. 


"देश आणि राज्य अस्थिर करण्याचा यांचा कुटीव डाव आहे. टेक्सटाईल कमिशनरचं ऑफिस राज्याबाहेर दिल्लीला जात असल्याची माहिती मिळत आहे. एसीसीचं मुख्य कार्यालयही हे गुजरातमध्ये गेलं आहे. दिल्लीश्वरांच्या चरणी महाराष्ट्र अर्पण करायचा आणि त्यांचे गुलाम बनून एकनिष्ठ स्वामीभक्त होत त्यांच्यावर कोणी काही बोललं तर कारवाई करायची असं सुरु आहे," असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.