मुंबई / नंदुरबार : राज्यात अनेक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक (Coronavirus) पाहायला मिळत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने लसीकरण मोहीम (Corona Vaccination) हाती घेतली. मात्र, आजही काही ठिकाणी कोरोना लसीकरणाला गावातील नागरिकांचा विरोध दिसून येत आहे. गैरसमजामुळे नोंदणीला मिळणारा नकार मिळत आहे. असाच प्रकार आदिवासी भागात दिसून येत आहे. दुर्गम डोंगराळ भाग. साधनांच्या मर्यादा. यापूर्वीच्या प्रयत्नात आलेले अपयश. अशी सर्व प्रतिकूल परिस्थिती असताना अक्कलकुवा तालुक्यातील चिखली येथील जिल्हा परिषद शाळा पाटीलपाडाचे मुख्याध्यापक दीपक वसावे यांना अभिनव कल्पना सूचली. ‘गुरुजीं’चा अनुभव उपयोगात आला आणि चिखली गावात चार नागरिकांची लसीकरणासाठी नोंदणी झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार ही संख्या मोठी नसली तरी प्रयत्नपूर्वक केलेल्या प्रयत्नांची आणि त्यामुळे झालेल्या बदलाची निदर्शक आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरणासाठी नोंदणी करण्याचे काम शिक्षकांमार्फत करण्यात येत आहे. बऱ्याच गावात लसीकरणाबाबत गैरसमज असल्याने आधी ग्रामस्थांना लसीकरणाचे महत्त्व समजावून त्यांचे नोंदणीसाठी सहकार्य मिळविणे मोठे आव्हान आहे. शिक्षकांनी अत्यंत संवेदनशीलतेने हे काम लिलया करीत लसीकरणाला वेग देण्यासाठी चांगली मदत केली आहे.


आयडियाची भन्नाट कल्पना !


अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील शिक्षकांचा अनुभवदेखील काही वेगळा नाही. काही ठिकाणी लसीकरण म्हणताच दार बंद केले जाते किंवा बाहेरचा व्यक्ती घरात येऊ नये ही ताकीद देण्यात येते. मुलांना समस्येवर मात कशी करायची याचे शिक्षण देणाऱ्या शिक्षकांनी आपल्या याच अनुभव आणि ज्ञानाचा उपयोग करीत जनजागृतीचे काम सुरू ठेवेले आहे. अशाच एका ‘मास्तरा’ने आपली दुचाकी काढली. दररोज प्रार्थनेसाठी घेतलेला ध्वनीक्षेपक बंद होता. जनतेला प्रसन्न करण्यासाठी तो गाडीवर ठेवला आणि स्वारी पोहोचली पाड्यावर. घराबाहेर न येणारे ग्रामस्थ गोळा झाले आणि सुरू झाला जनजागृतीचा तास.


वसावे यांनी मित्राशी चर्चा करुन ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याचे निश्चित केले. स्वत:च्या मोटर सायकलवर ध्वनीक्षेपक आणि माईक घेऊन गुरुवारी पाटीलपाड्यावर पोहोचले. अजूनही ग्रामीण भागात ध्वनीक्षेपकाचे आकर्षण असल्याने विखूरलेल्या वस्तीवरील ग्रामस्थ घरातून बाहेर पडत ऐकू लागले. संवाद अधिक प्रभावी होण्यासाठी वसावे यांनी स्थानिक भाषेचा उपयोग केला. त्यामुळे त्यांना प्रतिसादही चांगला मिळू लागला आहे.


लसीकरणाचे फायदे, लसीकरण कुठे  सुरु आहे, लसीकरणासाठी वयाची पात्रता, लस घेऊन आल्यावर घ्यावयाची दक्षता, मास्कचा वापर आणि शारीरिक अंतराचे पालन  आदी बाबी दुर्गम भागात पोहोचल्या.  शेवटी त्यांनी लसीकरणासाठी आवाहन केले. चार नागरिक तयार झाले. त्यांनी ही संधी न दवडता मोबाईल कव्हरेजसाठी जवळची टेकडी गाठली. आधार कार्डच्या सहाय्याने नोंदणी केली. समाधानाने स्वारी 29 किलोमीटर दूर असलेल्या आपल्या खापर गावाकडे परतली. दुसऱ्या दिवशी पुढच्या पाड्यावर जायचे आणि परिसरातील दोन-तीन गावात लसीकरण शिबीर भरवायचेच हा निश्चय मनाशी बांधून.


नागरिकांना माहिती दिल्यावर ते प्रतिसाद देतात. काही ठिकाणी मोटार सायकल ठेऊन पायी जावे लागते. पण नागरिक लसीकरणासाठी तयार झाल्यावर थकवा जाणवत नाही अशा शब्दात वसावे यांनी आपल्या पहिल्या दिवसाचा अनुभव व्यक्त केला आहे. त्यांना गटशिक्षणाधिकारी रमेश देसले, केंद्रप्रमुख कांतीलाल पाडवी आणि मुख्याध्यापक सुनील मावची यांचे सहकार्य लाभले आहे.