मुंबई : विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आलेल्या असतानाच राजकीय पटलावर मोठमोठ्या हालचाली घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातही आता निवडणूक न लढवता रिमोट कंट्रोल हातात ठेवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ठाकरे कुटुंबातील युवा नेतृत्त्व आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील राजकारणाला रंग चढला आहे अशीच प्रतिक्रिया सर्वांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत पार पडलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात असंख्य शिवसैनिकांच्या साक्षीने खुद्द आदित्य ठाकरे यांनी ही घोषणा केली. यावेळी शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांपासून आदित्य ठाकरे यांच्या आई रश्मी ठाकरे यासुद्धा उपस्थित होत्या. 


निवडणुक लढवणार असल्याचं जाहीर केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सर्वांनाच अभिवादन केलं, मान्यवरांचे आशीर्वाद घेतले, ज्यानंतर पुन्हा एकदा उपस्थितांना संबोधित करण्यासाठी म्हणून ते उभे राहिले. तेव्हा त्यांच्यात दडलेल्या एका मुलाने त्याच्या आईला मनापासून साद दिली. आई आज इथे आहे... असं म्हणत मी मुद्दामच तिला मागे बसण्यास सांगितलं असं आदित्य म्हणाले. इतके दिवस जनतेला संबोधित करताना आपल्याला भाषण करण्याची सवय झाली होती. पण, आजच्या दिवशी, आजच्या क्षणी मात्र काहीसं दडपण आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ज्याकरता त्यांना आईची साथ लाभली. 


'आई समोर असली की....', असं म्हणणाऱ्या आदित्य ठाकरे आपल्यालाठी आईचं या ठिकाणी उपस्थित असणं किती महत्त्वाचं होतं हीच भावना त्यांनी व्यक्त केली.  त्यांच्या या वक्तव्यानंतर रश्मी ठाकरे यांच्या चेहऱ्यावरील सुरेख हास्य खुप काही सांगून गेलं. मुलाच्या जीवनात एका नव्या कारकिर्दीची सुरुवात होत असल्याला आनंद त्यांना होत होता. 


 


बालपणापासून शिवसेना आणि राजकीय नेतेमंडळींसोबत वावर असल्यामुळे आणि मुळात असेच संस्कार झाल्यामुळे आपलं राजकारणातच पुढे येणं निश्चित असल्याचं आदित्य या कार्यक्रमादरम्यान भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणाले. आपल्याला राजकी क्षेत्राशिवाय उतर काही येत नसल्याची बाब स्पष्ट करत त्यांनी या क्षेत्राप्रती आपलं स्वारस्य सर्वांसमोर ठेवलं. शिवाय आगामी निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी काही ध्येय्यही सर्वांपुढे मंडली.