जळगाव :  आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की, विद्यार्थी शाळेतून घरी पळून जातात, पण जळगाव जिल्ह्यात काही शिक्षक हे हजर होवून, नंतर शाळेतून घरी पळून जात असल्याच्या तक्रारी आहेत. शिक्षक शाळेत येतात, सह्या मारतात आणि लगेच घराची वाट धरतात. यामुळे फक्त कागदोपत्री शिक्षकांची हजेरी दिसून येते. जळगाव जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असे प्रकार वाढले आहेत. यात सर्वच शिक्षक असं करतात असं नाही, पण हा रोग कोरोनाच्या आजारासारखा इतर शिक्षकांमध्येही वाढत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अतिशय घातक आणि गंभीर प्रकाराला पायबंद घालण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मोठं पाऊल उचललं आहे. एवढंच नाही या प्रकाराला खतपाणी घालणाऱ्या वरिष्ठांचीही गय केली जात नसल्याचं कारवाईवरुन दिसून येत आहे.


या कारवाईमुळे आता सह्या मारुन लगेच घरी पळणाऱ्या मास्तरांनी धसका घेतला आहे. या प्रकरणी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भगवंतराव पाटील यांनी मोठी कारवाई केली आहे. 


जळगाव जिल्ह्यात गटशिक्षण अधिकाऱ्यासह ५ शिक्षक निलंबित करण्यात आले आहेत. मुक्ताईनगर येथील गट शिक्षण अधिकाऱ्यांनाही घरचा रस्ता दाखवला आहे. रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील शिक्षकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. आणखी ५ ते ६ शिक्षकांवर कारवाई करण्याचे संकेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. गटशिक्षण अधिकाऱ्यांना कामात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.


जळगाव जिल्ह्यात या प्रकार वाढले आहेत. यावर पालकांनी शिक्षक शाळेत येऊन, लगेच सह्याकरुन घरी निघून जातात, याबाबत लेखी स्वरुपात तक्रारी रजिस्टर पोस्टाने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भगवंतराव पाटील यांच्याकडे करण्याचे ठरवले आहे.