ठाणे : कल्याण येथील वाडेघर भागातील महिलेने आपल्या दोन मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकाच दिवशी अशा प्रकारच्या दोन आत्महत्या घडल्याचे समोर आले आहे. अनिता कनोजिया (२९) या महिलेने आपली मुलगी नंदिनी कनोजिया (९) आणि नऊ महिन्यांचा मुलगा दुर्गेश यांची हत्या करून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर वाडेघर नाईकवाडी येथील विलास पाटील चाळीत कनोजिया कुटुंबीय भाडय़ाने राहत होते. अनिताचा पती इस्त्रीचा व्यवसाय करीत असून आर्थिक परिस्थितीविषयी अनिता नेहमीच विवंचनेत असल्याची माहिती तिच्या पतीने पोलिसांना दिली.


पती कामावर गेलेला असताना शनिवारी दुपारी मुलांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना जाळले. यात दोन्ही मुलांचा मृत्यू झाला असून अशाच पद्धतीने अनिताने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.