मुंबई : कोरोनामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हाती घेण्यात आलेली 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सक्रिय सहभागाने यशस्वी होईल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ही यंत्रणा राज्यातील घराघरात पोहोचलेली आहे. प्रत्येक कुटुंबाशी अंगणवाडी ताईचा संपर्क असतो. त्यामुळे तुमच्या सक्रीय सहभागाने, सहकार्याने  'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम प्रभावीपणे घराघरात पोहोचेल. याआधी प्रत्येक उपक्रमात आपण भरीव कामगिरी केली आहे, आताही कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी तुमचा सहभाग मोलाचा आहे, असे यावेळी ॲड. ठाकूर यांनी सांगितले.  



महिला व बालविकास विभागाच्या अखत्यारीतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीमेतील  सहभागाबाबत शुक्रवारी मंत्री ॲड. ठाकूर यांनी ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, सर्व जिल्ह्यातील उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास, अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.


शासनाने राज्यभर 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी'  ही मोहिम राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील शहर, गावे, वस्त्या यातील प्रत्येक नागरीकाची आरोग्य तपासणी आणि प्रत्येक नागरिकास आरोग्य शिक्षण द्यावयाचे आहे. ही मोहीम दिनांक १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. मोहिमेची पहिली फेरी  १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोंबर या कालावधीत होईल आणि दुसरी फेरी दिनांक ११ ऑक्टोंबर ते २४ ऑक्टोंबर या कालावधीत होईल आणि मोहिमेची सांगता २५ ऑक्टोंबर रोजी होईल.