Ayodhya Ram Mandir Consecration Ceremony :  22 जानेवारी 2024 ला अयोध्येत भगवन श्रीराम मंदिरात रामल्ललाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेनंतर श्रीरामाच्या चरण पादुकाही तिथे ठेवल्या जाणार आहे. या पादुकांचं सध्या देशभरात दर्शन घडवलं जात आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी म्हणजे 19 जानेवारीला पादुका अयोध्येत आणल्या जातील. 22 जानेवारीच्या सोहळ्यासाठी देशभरातील अनेक नामवंत पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे.  या सोहळ्याचं सर्वात पहिलं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना देण्यात आलं. या सोहळ्याला 7 हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं असून यात 3 हजार VVIP पाहुण्याचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरेंना आमंत्रण?
दरम्यान, राम मंदिराच्या आंदोलनात योगदान असणाऱ्यांना सरकार निमंत्रण देणार नाही. ज्यांचं काहीही योगदान नाही अशांचा अयोध्येत सोहळा रंगणार असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलीय.  एकीकडे राम मंदीर ट्रस्टनं सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधी पक्ष नेत्यांना अयोध्या सोहळ्याचं निमंत्रण दिलं असताना राम मंदिराच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) निमंत्रण देणार नाहीत असा दावा संजय राऊतांनी केलाय राम मंदिराच्या लढ्यात जे सहभागी झाले होते त्यांना अयोध्येतील सोहळ्यापासून दूर ठेवण्यात आल्याची टीका राऊतांनी केली आहे. 


कलाकार, उद्योगपतींना निमंत्रण
या सोहळ्यासाठी देशभरातील कलाकार, उद्योगपती, खेळाडू, साधूसंत अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांना हजर राहण्याची विनंती  करण्यात आली आहे. यात महानायक अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, उद्योगपती रतन टाटा, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. क्रिकेटर्समध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि स्टार फलंदाज विराट कोहलीला सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. 


3000 हजार पाहुण्यांचा समावेश
सोहळ्यासाठी 3000 हजार व्हीव्हीआयपी पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली असून सर्वंना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली आहे. लोकप्रिय रामायण या मालिकेतील कलाकारांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. श्रीरामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल, सीतेची भूमिका साकारणारी दीपिक चिखलिया यांचा समावेश आहे. 


याशिवाय मोठे साधुसंत, शंकराचार्य धार्मिक नेते, शासकीय अधिकारी, निवृत्त सैनिक, वरिष्ठ वकील, वैद्यानिक, कवी, संगीतकार आणि पद्म पुरस्कार विजेत्यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या 50 कारसेवकांच्या कुटुंबियांनाही या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे. सोहळ्यात उपस्थित राहणाऱ्या सर्व पाहुण्यांची जेवण आणि इतर व्यवस्था करण्यात आली आहे.