मुंबई : पाच राज्यांत निवडणुकांमध्ये पक्षाला बसलेला फटका लक्षात घेता राज्यात भाजप आमदारांची बैठक बोलवण्यात आलेली आहे. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली आहे. राज्यात भाजपने निवडणूक तयारी सुरु केल्याचे बोलले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमदारांची ही बैठक मुंबईत बोलावली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवानंतर उभय नेत्यांमधील पहिलीच भेट होत आहे. या भेटीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी येत्या १९ डिसेंबरला भाजप आमदारांची मुंबईत बैठक बोलावली. त्यामुळे मोदी मुख्यमंत्र्यांना काय सल्ला देतात याचीही चर्चा आहे.


पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला आणि तीन राज्यातील भाजपची सत्ता गेली. भविष्यात महाराष्ट्रातही फटका बसू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी खबरदारी घेतली आहे. तीन राज्यातील पराभवानंतर भाजपच्या जोर- बैठका सुरु झाल्यात. मुख्यमंत्र्यांनी १९ डिसेंबरला भाजपच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली असून ती संध्याकाळी मुंबईत होणार आहे. 


या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्याच्या पक्षाच्या तयारीचा आणि विकास कामांच्या स्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच आगामी निवडणुकीसाठी व्युहरचना निश्चित केली जाणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, पक्षाचे संघटनमंत्री, मुख्य पदाधिकारी आणि सर्व आमदार उपस्थित असणार आहेत.