मुंबई : देशात नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना विषाणूचे संकट आहे, असे असले तरी सातत्याने लॉकडाऊन  (Lockdown)करुन उपयोग होणार नाही. कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे, दीर्घकालीन लॉकडाऊन योग्य नाही. कोविड-१९ (Covid-19)या साथीच्या रोगापेक्षा दीर्घकालीन लॉकडाऊन गंभीर संकट निर्माण होईल. कोरोनाशी सामना करण्यासाठी त्याच्यासोबत जगायला शिकले पाहिजे, असा सल्ला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप नेते  (BJP Leader) नितीन गडकरी (Nitin Gadkari)  म्हणाले, लोकांची सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेत यांच्यामध्ये योग्य संतुलन निर्माण करण्याची गरज  आहे. कारण साथीच्या रोगाचा अर्थव्यवस्थेवर खोलवर परिणाम झाला आहे. उपाशीपोटी कोणतेही तत्वज्ञान उपयुक्त नाही. कोविड -१९ बरोबर कसे जगायचे ते शिकले पाहिजे. एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले, स्वतःचे रक्षण करणे आणि अर्थव्यवस्थेला गती देण्याचे संतुलन साधण्याची गरज आहे.


गडकरी यांनी मान्य केले की, कोरोनाव्हायरसमुळे राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक पेचप्रसंगाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि केंद्राचा महसूलही कमी झाला आहे. ते पुढे म्हणाले की दीर्घकाळ लॉकडाऊन कोविड -१९ साथीच्या रोगापेक्षा गंभीर संकट निर्माण करेल.  हे आपले वैयक्तिक मत आहे, असे सांगून ते म्हणाले, लॉकडाऊनमुळे होणारा नफा आणि तोटा यावर प्रश्न विचारणे योग्य नाही.


लॉकडाऊन आवश्यक होते की नाही यावर चर्चा करणे योग्य नाही. त्यावेळी योग्य निर्णय घेण्यात आले. आपल्याला अनुभवातून शिकायला हवे. लॉकडाऊनवर राजकारण करण्याची गरज नाही. कोविड -१९  संकट आणि त्यानंतरच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार योग्य पाऊल उचलत आहेत, असे गडकरी म्हणाले.