Mumbai Local Train Update: पावसाळा म्हटलं की लोकलला होणारा विलंब नेहमीचा आहे. लोकलला होणाऱ्या विलंबामुळं अनेकांना घरी पोहोचणे कठिण जाते. तसंच, ऑफिसमध्येही लेटमार्क लागतो. मात्र, या वर मध्य रेल्वेने तोडगा काढला आहे. हार्बर रेल्वेचा आता लोकलचा वेग 80kmph ते 95 kmph पर्यंत वेग वाढवण्यात येणार आहे. टिळकनगर ते पनवेलदरम्यान आता लोकल रखडणार नाहीये. या मंगळवारपासून हा बदल करण्यात आला आहे. तसंच, या बदलामुळं प्रवाशांची पाच मिनिटे वाचणार आहेत. 3 जून रोजी यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी 25 जून रोजी याविषयी अंमलबजावणी करण्यातच आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेकडून सीएसएमटी ते पनवेलदरम्यान 188 सेवा आणि सीएसएमटी ते बेलापूर दरम्यान 79 सेवा चालवण्यात येतात. सीएसएमटी ते पनवेल दरम्यान 80 मिनिटांचा वेळ लागतो. तर, सीएसएमटी ते बेलापूर दरम्यान 65 मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळं लोकलचा स्पीड 105Kmphपर्यंत वाढवावा अशी मागणी होती. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या कारणास्तव 95 Kmphपर्यंत वेग वाढवण्यासाठी मंजुरी देण्यात आली. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल निला यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही हा बदल या मंगळवारपासून लागू केला आहे. 


मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, लोकलचा वेग ताशी 105 केल्याने दोन ट्रेनमधील अंतर ठेवणे कठिण गेले असते. त्यामुळं लोकलचा वेग ताशी 95 करावा, असे ठरवण्यात आले. रेल्वेचा वेग वाढवण्याबरोबरच मध्य रेल्वेकडून रेल्वे रुळांबाबतची परीक्षण केले जाणार आहे. जेणेकरुन लोकलमध्ये अडथळा येणार नाही. 


सीएसएमटी ते टिळकनगर या स्थानकांदरम्यान लोकलचे अंतर वाढवण्यात येणार नाहीये.  कारण  रेल्वे स्थानकांतील अंतर कमी आहे. त्यामुळं यादरम्यान अंतर वाढवण्यात आलेले नाहीये. कारण स्थानकात येताना रेल्वेचा वेग कमी करणे आव्हानात्मक ठरेल. तसंच, टिळक नगर ते वडाळा येथील अनधिकृत बांधकामेदेखील हटवण्यात आले आहेत. चुनाभट्टी-कुर्ला-टिळक नगर येथे रूळ ओलांडण्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्यामुळं या दरम्यानही लोकलचा वेग वाढवणे अशक्य आहे. 


कुर्ला ते मानखुर्द दरम्यानच्या प्रवासाचा वेग वाढवावा, अशी मागणी अनेक प्रवाशांनी केली होती. सध्या हार्बर मार्गावरील गाड्यांना कुर्ला आणि सीएसएमटी दरम्यान प्रवासासाठी 33 मिनिटे लागतात. मात्र, दोन्ही मार्गावरुन समान अंतर असूनही मेन लाइनवरुन कुर्ल्यापर्यंत जाण्यास 30 मिनिटे लागतात, असं नागरिकांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, मध्य रेल्वेने पनवेलला जाण्यासाठी अधिक गाड्या चालवण्याची गरज आहे, असी मागणीही प्रवाशांकडून केली जात आहे.