मुंबई : राज्यातील मंदिरं पुन्हा उघडण्याचा मुद्दा अधोरेखित करत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना एकपत्र लिहिलं. पत्रात त्यांनी थेट शिवसेनेच्या हिंदुत्त्वाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित करत आता त्यांनी धर्मनिरपेक्षता स्वीकारली आहे का, असा सवाल केला. ज्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या पत्रास उत्तर देत माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, अशी ठाम भूमिका मांडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रास दिलेलं उत्तर पाहता पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष राज्याच्या राजकारणात डोकं वर काढत असल्याचं दिसत आहे. 


राज्यपालांच्या पत्राला आणि विशेष म्हणजे हिंदुत्त्व, धर्मनिरपेक्षतेच्या प्रश्नाला उत्तर देत मुख्यमंत्री म्हणाले....


'आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही.माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचं हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही'. 


धर्मनिरपेक्षता स्वीकारली का, अशा रोखानं सूर आळवणाऱ्या राज्यपालांना केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. ज्या घटनेनुसार राज्यपाल पदाची शपथ घेतली त्या घटनेचा गाभा असणारी धर्मनिरपेक्षता मान्य नाही का, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनीही राज्यपालांच्या पत्राचं उत्तर दिलं. 


 


जनतेच्या जीवाची काळजी घेण्यास प्राधान्य 


जनतेच्या भावना आणि श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणं हे सरकारचं प्रथम कर्तव्य आहे म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणं चुकीचं तसंच तो एकदम उठवणंही अयोग्यच, ही बाब मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली. इतकंच नव्हे तर, राज्यपालांच्या पत्राचा गांभीर्यानं विचार करत सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल अशी हमी त्यांनी दिली.