अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: राज्यात जलयुक्त शिवारच्या कामात गैरव्यवहार झालेल्या १३०० प्रकरणांची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करण्याचे निर्देश सभापती रामराजे निंबाळकर यांनी सोमवारी दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जलयुक्त शिवारच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा आज विधानपरिषदेत पुन्हा उपस्थित कऱण्यात आला. गेल्या आठवड्यात हा प्रश्न उपस्थित करण्यात आला असता हा प्रश्न राखून ठेवण्यात आला होता. 


राज्यभरातील सुमारे १३०० जलयुक्त शिवारच्या कामांची जिल्ह्याबाहेरील अधिकाऱ्यांची नेमणूक करून विभागीय चौकशी सुरू केल्याची माहिती जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिली होती. याबाबत तांत्रिक अहवाल आल्यावरच या प्रकरणात लाचलूचपत प्रतिबंध विभागाकडून (एसीबी) चौकशी करायची की नाही, हा निर्णय घेऊ असे जलंसधारण मंत्र्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, आज याबाबत प्रश्न उपस्थित होताच जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा तेच उत्तर द्यायला सुरुवात केली. 


विरोधकांनी यावर आक्षेप घेताच सभापती रामराजे निंबाळकर य़ांनी यामध्ये हस्तक्षेप केला. जलयुक्त शिवारच्या कामात गैरव्यवहारच्या किंवा अनियमितता यांच्या ज्या तक्रारी आल्या आहेत. त्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करण्याचे निर्देश सभापतींनी यावेळी दिले.