वादळाचा जोर ओसरेपर्यंत सुरक्षितस्थळी थांबा - उपमुख्यमंत्री अजित पवार
निसर्ग चक्रीवादळ आल्याने किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबावे.
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ आज दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषत: अलिबाग, पालघर परिसरात धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबावे. वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
चक्रीवादळापासून जीवित आणि वित्तहानी होऊ नये म्हणून प्रशासनाने संपूर्ण दक्षता घेतली आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लाईफगार्ड, पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान सज्ज ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.
आरोग्य यंत्रणा, स्थानिक प्रशासन देखील दक्ष असून राज्याची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज आहे, आवश्यकतेनुसार तात्काळ मदत उपलब्ध करण्याचे नियोजन झाले आहे. या वादळाचा वेग आणि ताकद मोठी असल्याने नागरिकांनी सावध, सुरक्षित राहावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.