मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बनंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, ''शिवसेनेचे आमदार आणि नेते काय विचार करतात हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी त्यांच्या प्रमुखांना पत्र लिहलंय, ते काय उत्तर देतील या त्यांचा प्रश्न आहे. आम्ही एक सक्षम विरोधीपक्ष म्हणून काम करीत आहोत, आम्ही जनतेचे प्रश्न मांडत आहोत, लढत आहोत.''


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

''यापूर्वी शिवसेना आणि भाजपाने एकत्र निवडणूक लढवली होती, तरी देखील भाजपा एक सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून विधानसभेत आली होती, सर्वात जास्त जागा जिंकल्या होत्या. आता आम्हाला विश्वास आहे, आम्ही स्वबळावर जरी लढलो, तरी आम्ही बहुमताने येऊ. सत्ताधारीत कुणाला त्यांना जोडे मारायचे आहे, कुणाला हार घालायचे आहेत, त्यांचं ते पाहतील.''


''यापुढे देखील आम्ही एक पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, आणि यापेक्षा चांगलं यश लाभेल असा विश्वास आम्हाला आहे, आमची बांधिलकी ही जनतेशी आहे, हे जनतेला माहित आहे'', असं विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं आहे.



'भाजपशी पुन्हा जुळवून घ्या...' प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बने मोठी खळबळ


शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सांगितलं होतं की, सत्तेत असलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपले कार्यकर्ते फोडत आहेत. यामुळे पक्ष कमकुवत होत आहे, अशा आशयाचं पत्र प्रताप सरनाईक यांनी लिहिलं होतं. शिवाय या पत्रात पंतप्रधान मोदींशी जुळवून घेतलेलंच बरं असंही सरनाईक यांनी म्हटलं आहे.


प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांनी लिहलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "सध्याच्या परिस्थितीतही जे राजकारण सुरु आहे त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याशी जुळवून घेतलेलं बरं, असं वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे."


"आम्हाला टार्गेट करीत असताना आमच्या कुटुंबियांवर सुध्दा सतत आघात होत आहेत, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवणं, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणं, अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल," असंही सरनाईक यांनी पत्रात नमूद केलं आहे.