मुंबई : विधानसभेत आज भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधीपक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा प्रस्ताव सभागृहात ठेवला. यावेळी सर्वच पक्षाच्या गटनेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. काही नेत्यांनी या दरम्यान फडणवीसांच्या मी पुन्हा येईन या वक्तव्याची खिल्ली ही उडवली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला बहुमत मिळूनही महायुतीचं सरकार स्थापन होऊ शकलं नाही. त्यानंतर सोशल मीडियावर आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून याची खिल्ली उडवली गेली. पण आज सभागृहात यावर देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, 'मी पुन्हा येईन असं म्हटलं होतं. महाराष्ट्राच्या जनतेने मला पुन्हा आणलं ही. जनादेश हाच होता. आम्हाला १०५ जागा मिळाल्या. आम्ही सर्वात मोठा पक्ष ठरलो. पण पुन्हा येईनचा टाईम टेबल मी सांगितला नव्हता. त्यामुळे वाट बघा. 'मेरा पाणी उतरता देत मेरे किनाऱे पे घर मत बसा लेना, में संमदर हूँ लोट के वापस आऊंगा.' अशा शब्दात त्यांना विरोधकांना इशारा दिला.


'पुन्हा आलो तर तुमच्यासोबतच येईल असं ही फडणवीसांनी भुजबळांना उत्तर देतांना म्हटलं. आता काहीही अशक्य राहिलेलं नाही असं म्हणत त्यांनी शिवसेनेला ही टोला लगावला. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आली तर आता राजकारणात काहीही अशक्य राहिलेलं नाही. जयंत पाटीलजी प्रोजेक्ट सुरु आम्ही केले पण उद्घाटन ही आम्हीच करु असं देखील त्यांनी म्हटलं. सांगितलेला प्रत्येक प्रोजेक्ट सुरु केला. कोणाच्या गाडीत जायचं हे तेव्हा ठरवू. असं ही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.


'विरोधीपक्ष नेतेपदाची मोठी परंपरा लाभली आहे. विरोधीपक्ष नेत्याने आतापर्यंत समाजाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. मी आपल्याला विश्वास देतो. जनतेच्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करु. मुख्यमंत्र्यांनी कधीही आवाज द्यावा. आमचा सकारात्मक प्रतिसाद असेल. जनतेसाठी निश्चित सहकार्य मिळेल. सभागृहात कामकाज करताना विनाकारण बदनाम करणं, वैयक्तीक आरोप करणं या पदावरुन मी कधीच असं करणार नाही. हे पद एका ऊंचीवर नेईल. असं काम मी करेल' असं ही फडणवीस म्हणाले.