मुंबई : लॉकडाऊनमुळे मुंबईच्या डबेवाल्यांना मोठा फटका बसला आहे. डबेवाल्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिलेले आहे. याबाबत डब्बेबाल्यांनी राज्य सरकारकडे मदतीची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी मुंबई शहतचे पालकमंत्री अस्लम शेख यांची डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी डबेवाल्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या मंत्रिमंडळ बैठकीत ठेवीन, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे. तसेच यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते सोमवारी डबेवाल्यांना  २,५०० रेशन किटचे वितरण करण्यात आले.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महानगरपालिकेच्या पी- उत्तर विभागाच्या कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुंबई डबेवाले संघटनेचे अध्यक्ष रमेश करोंदे, सहाय्यक प्रवक्ता विनोद शेटे , मेक अर्थ ग्रीन अगेन मेगा फाऊंडेशनच्या अनुशा श्रीनिवासन अय्यर व महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


डबेवाले हे मुंबईची दुसरी जीवनवाहिनी आहेत. डबेवाले १३० वर्षांपासून प्रामाणिकपणे व सचोटीने कार्यालयांमध्ये वेळेवर जेवणाचे डबे पोहोचविण्याचे काम करीत आहेत. लॉकडाऊन संपेपर्यंत डबेवाल्यांच्या रेशनची व्यवस्था करण्याची व डबेवाल्यांचे सर्व प्रश्न येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्याची ग्वाही पालखमंत्री शेख यांनी यावेळी दिली. 


तसेच चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या पुण्यातील डबेवाल्यांच्या घरांचे पंचनामे त्वरित करण्याचे  आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली. लॉकडाऊनमुळे डबेवाल्यांसमोर उभे राहिलेले आर्थिक संकट, भविष्यातील या व्यवसायाशी निगडित आव्हाने आणि प्रश्न आदींविषयी मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष रामदास  करोंदे यांनी मंत्री  शेख यांच्यासमोर मांडले.


बांधकाम मजुरांना केल्या जाणाऱ्या मदतीच्या धर्तीवर डबेवाल्यांनाही दोन हजार रुपयांची मदत करण्याची आणि चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्याचे मूळ निवासी असणाऱ्या डबेवाल्यांना त्वरित पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी संघटनेचे प्रवक्ते विनोद शेटे यांनी यावेळी केली.