मुंबई : गेली कित्येक वर्ष संपूर्ण गणेशोत्सव 'टिंब..टिंब.. टिंबाली..' , गौरी गणपतीच्या सणाला… , माझ्या गणानं घुंगरू हरवलं…' या गाण्यांनी गाजवला आहे. गणरायाचं आगमन म्हटलं की ही गाणी आपसुकच तोंडी येतात. मात्र या गाण्यांना सूर देणाऱ्या व्यक्तीला आपण विसरलो आहोत. विसरलोच काय पण बऱ्याच जणांना यांच नाव देखील माहित नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तमराव कांबळे यांच्या सुरांनी ही अजरामर गाणी सजली आहेत. पण आज हे उत्तमराव साठीच्या उंबऱ्यात असताना मात्र एकटे आहेत. पुणे शहरातील भवानी पेठ परिसरातील झोपडपट्टीत छोट्याश्या पत्र्याच्या घरात राहणार्‍या या कलावंतावर सध्या अत्यंत हलाखीचे दिवस आले आहेत. ते सध्या राहत असलेले घरसुद्धा त्यांच्या सासूबाईंचे आहे. उत्तम कांबळे यांनी आपल्या आयुष्यात अनेक गाणी लिहिली आहेत. आता त्यांनी आपल्या वयाची साठ वर्षे पूर्ण केली आहेत. आयुष्यभर त्यांनी स्वत:ला लोककलेसाठी झोकून दिले आहे. परिस्थितीअभावी त्यांना शिक्षण देखील पूर्ण करता आले नाही.


या वयातही अथक प्रयत्न करून ते आपल्या संसाराचा गाडा ओढत आहेत. वय झाले असले तरी पत्नी दुसर्‍याच्या घरी घरकाम करत आहे, तर मुलगा दुसर्‍याच्या वाहनांवर ड्रायव्हर म्हणून काम करत आहे. कांबळे यांना वयोमानामुळे काहीच काम करता येत नसून ते सध्या घरीच आपली कला जोपासण्याचे काम करत आहेत. या गाण्यांनी त्यांना आनंद दिला पण संपत्ती मात्र यांच्यापासून दूरच राहिली. 


कांबळे यांनी गणेशोत्सवावर अनेक गाणी रचली आहेत. यामध्ये ‘माझ्या गणानं घुंगरू हरवलं.., गौरीला घावलं! बंधू येईल माहेरा न्यायला…, गौरी गणपतीच्या सणाला!’ याशिवाय प्रत्येक सणात डीजेवर वाजणारे लोकप्रिय गीत ‘बघ..बघ..अग सखे कस गुबू…गुबू वाजतंय, माठाला गेला तडा…,’ ही गवळण व अन्य अनेक गाणी रचली असल्याचे त्यांनी सांगितले.