दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कर्जमाफीसाठी अर्ज करणाऱ्या शासकीय अधिकारी, शिक्षकांवर कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज दुपारपर्यंत 57 लाख 68 हजार 254 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. आता सरकार उद्यापासून या ऑनलाईन अर्जाची छाननी केली जाणार आहे. ही छाननी पूर्ण झाली की पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची संख्या समोर येईल. 


राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर करताना काही अटी घातल्या आहेत, या अटीनुसार शासकीय सेवेतील चतुर्थश्रेणी कर्मचारी वगळता इतरांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ऑनलाईन अर्जात चतुर्थश्रेणीच्यावरील कर्मचारी, अधिकारी आणि शिक्षकांनी जर अर्ज भरले असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिलीय. 


अर्जाची छाननी पूर्ण झाल्यानंतर चावडी वाचनामार्फत प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या अंतिम यादीचे वाचन केले जाणार आहे. यात बँकांकडून आलेली माहिती आणि ऑनलाईन अर्जांची पडताळणी करून होणाऱ्या अंतिम यादीचे वाचन ग्रामपंचायत स्तरावर केले जाणार आहे. चावडी वाचन केल्याने बोगस शेतकरी समजण्यास मदत होईल, असा सरकारचा दावा आहे.