मुंबई : शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष आपली जागा निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, सहाव्या उमेदवाराची सर्व मदार ही अपक्ष आमदार आणि छोटे पक्ष यावर अवलंबून आहे. या अपक्ष आमदार आणि छोटे पक्ष यांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने त्यांना विकासनिधीचे लालूच दाखविले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आघाडी सरकारने या अपक्ष आमदार आणि छोटे पक्ष यांना कोट्यवधी रूपयांचा अतिरिक्त निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, त्या बदल्यात त्यांनी शिवसेनेचे संजय पवार यांच्याबजाऊने आपले मत टाकावे अशी अट घालण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


महाविकास आघाडीच्या बाजूूने राहिल्यास उर्वरित अडीच वर्षांमध्ये मतदारसंघातील विकास कामांसाठी विविध खात्यांमधून निधी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. काही अपक्ष आमदारांनी मतदारसंघातील महत्वाच्या आगामी विकास कामांची यादी आणि रखडलेल्या कामांची यादी बनवली असून ती पूर्ण करण्याचे आश्वासन आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडून दिले जात आहे. 


तसेच, मुख्यमंत्री यांच्या कक्षेत येणाऱ्या कामाची दखल घेऊन त्यांची नाराजी दूर करण्यासाठी थेट मुख्यमंत्री या आमदारांशी चर्चा करत आहेत असे सूत्रांनी सांगितले. मतदारसंघात चांगली विकासकामे झाल्यास परत निवडून येण्याची आशा असल्याने अनेक अपक्ष आमदार महाविकास आघाडीच्या बाजूने अनुकूल असल्याचेही सूत्रांनी सांगितले.