मुंबई : राष्ट्रवादीचे गायब झालेले दौलत दरोडा आणि अनिल पाटील हे दोन आमदार मुंबईत राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाले. आपण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे या दोन आमदारांनी मीडियासमोर स्पष्ट केले आहे. आपल्याला गुडगावमध्ये ठेवण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले. त्यांना तिथे कसे नेण्यात आले. त्यांना याबाबत माहीत नव्हते. मात्र, मीडियात आलेल्या बातम्यानंतर आमच्या लक्षात आले. त्यानंतर आम्ही पवारसाहेबांना फोन केला आणि त्यांनी आमची सुटका करण्यास मदत केली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार यांच्या संपर्कात असणारे आणि शपथविधी घेताना त्यांच्यासोबत असलेल्या दौलत दरोडा आणि अनिल पाटील या राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची सुटका युवती काँग्रेसच्या सोनाली भुवन यांनी केली. सोनाली यांनी सांगितले की, हे राजकीय अपहरण आहे. त्यांना भाजपच्या गुंडानी हॉटेलमध्ये कोंडले होते. हरियाणात भाजपची सत्ता आहे. त्यांनी सत्तेचा गैरवापर करत हॉटेलमध्ये तीन वेगवेगळ्या खोलीत ठेवले होते. यादव नावाने या हॉलेटचे बुकिंग करण्यात आले होते, असे सोनाली यांनी 'झी २४तास'ला माहिती दिली.



राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी तीन आमदार पक्षात परत आले आहेत. अनिल भाईदास पाटील, दौलत दरोडा आणि नरहरी झिरवळ हे तिघेही दिल्लीहून मुंबईला परत आले आहेत. गुडगावमधल्या हॉटेल हयातमध्ये या आमदारांना ठेवण्यात आले होते. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया धुगन यांनी या आमदारांना मुंबईत आणले. अजित पवारांसोबत आता केवळ पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे आहेत. त्यामुळे अण्णा बनसोडेही पक्षात परतणार की अजित पवारांसोबतच राहणार याकडे लक्ष आहे. 


पळविण्यात आलेल्या आमदारांकडून थरारनाट्य


तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना दिल्लीत कसं नेलं आणि त्यानंतर त्यांचा  संपर्क शरद पवारांशी कसा झाला ? भाजपचे पदाधिकारी, मोठा बंदोबस्त असतानाही परत कसे आले ? या सगळ्या नाट्यमय घडामोडी कशा घडला याचा वृत्तांत आमदार अनिल पाटील आणि दौलत दरोडा यांच्याच तोंडून ऐका. त्यातील एक आमदार आजारी असल्याने दिल्लीत उपचार घेत आहेत, अशी माहिती देण्यात आली.



आम्हाला रात्री फोन आला. आपल्याला सरकार स्थापन करायचे आहे. आम्हाला वाटलं. आमच्या नेत्यांनी निर्णय घेतला असेल. त्यामुळे आम्ही राजभवनाकडे गेलो. तेथे भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार येणार असे वाटले. त्यामुळे आम्ही तेथे उपस्थित होते. त्यानंतर नेत्यांनी सांगितले आम्ही सांगतो तसे करा, आमच्याबरोबर या. त्यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात आम्हाला विमानतळावर नेण्यात आले. तेथून गुडगावला आणण्यात आले. एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले.


आम्ही मीडियातील बातम्या पाहिल्यानंतर आम्हाला अंदाज आला. त्याचवेळी आम्ही शरद पवारसाहेबांशी संपर्क केला. त्यांनी सांगितले काही चिंता करु नका, तुम्हाला सुखरुप बाहेर काढतो. त्यानंतर दिल्लीतून राष्ट्रवादीचे काही मंडळी आलीत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही केले. हॉटेलमधून खाली उतरलो आणि त्यांनी सांगितलेल्या रस्त्याने बाहेर पडलो. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मुंबईत आणण्यास मदत केली. आम्ही शरद पवारांसोबत आहोत. ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, असे स्पष्ट केले.