Jitendra Awhad Statement : प्रभू श्रीराम मांसाहारी होते असं विधान जितेंद्व आव्हाड यांनी केलं आणि एकच वाद निर्माण झाला. आव्हाडांच्या या विधानामुळे हिंदुत्वावादी संघटना (Hindu Sanghatna) आणि भाजपला (BJP) आयतं कोलीत मिळालं. आव्हाडांविरोधात राज्यभरात आंदोलनं सुरु झाली. घाटकोपरमध्ये भाजप आमदार राम कदमांनी आंदोलन केलं. आव्हाडांच्या वक्तव्यावर आज सामना आणि ठाकरे  गटाचे प्रवक्ते गप्प का असा सवाल यावेळी राम कदमांनी उद्धव ठाकरेंना विचारला.. घाटकोपरच्या चिरागनगर पोलीस ठाण्याबाहेर यावेळी आव्हाडांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.. त्यावेळी पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली. राम कदम यांनी आव्हाडांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर आव्हाडांना पुण्यात फिरु देणार नाही असा इशारा देत भाजपनं पुण्यात आंदोलन केलं.  ठाण्यात तर आव्हाडांविरोधात राष्ट्रवादी अजित पवार (NCP Ajit Pawar Group) गटानं आव्हाडांविरोधात आंदोलन केलं, गुन्हा दाखल झाला नाही तर पोलीस स्टेशनसमोर महाआरती करण्याचा इशारा दिला. भाजप आमदार नितेश राणेंनी आपल्या खास शैलीत आव्हाडांना टोला लगावला. रामाबाबत वादग्रस्त करणा-या जितेंद्र आव्हाडांना भाजप आमदार नितेश राणेंनी आव्हान दिलंय. आव्हाडांनी रामानं मांसाहार केल्याचा पुरावा द्यावा अन्यथा धर्मांतर करून कायमस्वरुपी मुंब्र्यात जावं असं नितेश राणेंनी म्हटलं. त्यावर आव्हाडांनी पलटवार करत नितेश राणे वाचतात किती, ऐकतात किती आणि बोलतात किती याबाबत महाराष्ट्राला प्रश्न असल्याचं म्हटलंय.


जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर येत्या 24 तासात त्यांचा विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी अजित पवार गटाने केलीय. अन्यथा वर्तक नगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून महाआरती करू असा इशारा आनंद परांजपेंनी दिलाय. वनवासात असताना राम शिकार करून खायचा. यावरून अजित पवार गट आक्रमक झालाय. रात्री अजित पवार गटाने आव्हाडांच्या घरांवर मोर्चा काढून निषेध केला. एकीकडे आव्हाडांविरोधात भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत असताना साधू-महंतही आव्हाडांविरोधात आक्रमक होताना दिसले. 


आपल्या वक्तव्यावर आव्हाड ठाम
आता इतका वाद झाल्यानंतर आव्हाड शब्द मागे घेतील किंवा माफी मागतील असं वाटत होतं मात्र आव्हाडांनी आपल्या विधानावर ठाम असल्याचं म्हटलंय. रामाबद्दलच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांनी खेद व्यक्त केलाय...मी इतिहासाचा कधीही विपर्यास करत नाही. अभ्यासात आहे तेच बोललोय. मात्र, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो असं आव्हाड म्हणालेयत. राम हा शाकाहारी नव्हे मांसाहारी होता...वनवासात राम शिकार करून खायचा असं विधान आव्हाडांनी केलं होतं. त्यावर आव्हाड ठाम असून, वाल्मिकी रामायणात अयोध्या कंदात हे लिहिल्याचा दाखला त्यांनी दिलाय.


वादग्रस्त विधान करण्याची आव्हाडांची ही पहिलीच वेळ नाही. आता प्रभू श्रीरामाबद्दलच्या विधानानं त्यात आणखी एकाची भर पडलीय.अयोध्येत राम मंदिर लोकार्पणाची जय्यत तयारी सुरु आहे. त्याच धामधुमीत प्रभू श्रीराम मांसाहारी असं वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाडांनी केलं. आव्हाडांचं विधान चूक की बरोबर हा वेगळा मुद्दा मात्र त्यांच्या विधानानं भाजपसह हिंदुत्ववादी पक्षांना आयता फुलटॉस मिळाला हे नक्की.