मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालंय. शिवसेनेचे अनेक आमदार शिंदेंच्या गोटात दाखल झाल्याने राज्य सरकार पडतं की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. या सर्व राजकीय घडामोडींमुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. त्यात आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज (24 जून) संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत पुढच्या वाटीचालीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं दादांनी स्पष्ट केलं. (maharashtra politcal crisis dcm ajit pawar meet for cm uddhav thackeray today evening)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात सत्तासंघर्ष पेटल्याने गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संध्याकाळी साडे सहा वाजता मातोश्री या निवासस्थानी भेटणार आहेत.


अजित पवार काय म्हणाले?


"राज्यात सुरु असलेल्या घडामोडींबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यानुसार पुढील रणनिती ठरवली जाणार आहे.  राज्य सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न केले जातील. आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत ठामपणे पाठिशी आहोत", असं दादांनी ठासून सांगितलं.


"मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत, गेलेले आमदार शिवसेनेचे आहेत.  मग राज्य सरकार हे अल्पमतात असल्याचं कसं काय म्हणता येईल", असा सवालही दादांनी उपस्थित केला. तसेच सरकार बहुमतात आहे. त्याबाबतचा निर्णय हा अध्यक्ष घेतील, असंही पवारांनी नमूद केलं.