Maharashtra Politics : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. शिवसेनेतून 40 आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सहभागी झाले आणि महाराष्ट्रात मोठी उलथापालथ झाली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर महविकास आघाडी सरकारही कोसळलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता आमदारांच्या बंडांनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील अनेक खासदार एकनाथ शिंदेंसोबत जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील 18 पैकी 11 खासदार शिंदेंसोबत जातील अशी सूत्रांची माहिती आहे. भाजपसोबत जुळवून घ्या अशी शिवसेनेतील अनेक खासदारांची इच्छा आहे. त्यामुळे ते थेट शिंदेगटात सहभागी होऊ शकतात. 


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचं आवाहनच खासदारांनी केलं आहे. 40 आमदार पक्षाला सोडून गेले आहेत. विधानसभा निवडणुकांना अजून अडीच वर्ष आहेत. अडीच वर्ष हा मोठा काळ आहे. या काळात पक्ष वाढवणे हे सर्वात मोठं आव्हान शिवसेनेसमोर आहे.


शिवसेनेला संघटनात्मक पातळीवरही खिंडार
दरम्यान शिवसेनेला संघटनात्मक पातळीवरही खिंडार पडायला सुरूवात झालीय. मागाठाणेतील दोन शाखाप्रमुख आणि तीन महिला शाखा संघटकांनी पदांचे राजीनामे दिलेत. मुंबईत शिवसेनेचे आमदार शिंदे गटात गेल्यानंतरही आतापर्यंत संघटनात्मक पातळीवर कुणीही राजीनामे दिले नव्हते, पण आता बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरूवात केली आहे.