COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई: मराठा आरक्षणाचं आंदोलन थांबावायला हवं, असं आवाहन माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणेंनी केलंय. झी २४ तासला दिलेल्या खास मुलाखतीत नारायण राणेंनी मराठा आरक्षणासाठी सध्या सुरू असलेल्या हिंसक आंदोलनामागे राजकीय पक्ष असल्याचा आरोपही केलाय. पवारांनी चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलंय. त्यांनी महाराष्ट्राच्या प्रतीमेला काळीमा लागेल अशा घटना रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा असंही राणेंनी म्हटलंय. शिवाय मराठा आरक्षणासाठी घटना दुरुस्तीची गरज नसल्याचंही त्याचं म्हणणं आहे.  


शिवसंग्रामच्या विनय मेटेंचाही पवारांवर आरोप


दरम्यान, समाजातील जातीपातींचा अंत होणे शक्य नाही, असे वक्तव्य शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केले. सध्या राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी 'झी २४ तास'शी संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती आवश्यक आहे, असे मत शरद पवारांसह अनेक नेत्यांनी मांडले होते. मात्र, घटनादुरुस्ती ही काही सोपी बाब नाही. शरद पवारांनी शक्य असूनही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, असा आरोपही मेटेंनी केला. परंतु, तुर्तास मराठा समाजाला शांत करण्याची गरज आहे. मराठा तरुणांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


काहीही करा पण मराठा समाजाला आरक्षण द्या - उद्धव ठाकरे


दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट पाहण्याची कोणतीही गरजच नाही. मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे, अशी ठाम भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली. ते सोमवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.