मुंबई: पुणे आणि मुंबईतील कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फैलाव रोखायचा असेल तर या दोन्ही शहरातील लोकसंख्या कमी करण्याची गरज असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, सध्याच्या घडीला मुंबई आणि पुण्यात ज्याप्रकारे लोकसंख्या वाढत आहे, ते पाहता लोकसंख्येचे स्थलांतरण गरजेचे आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोन्ही शहरातील किमान ३० टक्के लोकसंख्या कमी होणे गरजेचे आहे. त्यासाठी तीन दिवस रेल्वे सुरू करून लोकांना त्यांच्या गावी जाऊन देण्यात यावे. हे लोक गावी गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली या लोकांना क्वारंटाईन करण्यात यावे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

देशभरात महाराष्ट्र हे सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. महाराष्ट्रात गुरुवारी कोरोनाचे ५८३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १०, ४९८ इतका झाला आहे. यामध्ये मुंबईतील ७०६१ रुग्णांचा समावेश आहे. तर आतापर्यंत शहरातील २९० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईच्या तुलनेत पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी येथील मृत्यूदर हा चिंतेचा विषय आहे.


महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये परराज्यातील लाखो मजूर अडकून पडले आहेत. केंद्र सरकारने या सर्वांना आपापल्या राज्यात पाठवण्यासाठी सशर्त मंजुरी दिली आहे. मात्र, केंद्राने रेल्वेसेवा सुरु करण्यास नकार दिला आहे. मात्र, रस्तेमार्गाने इतक्या मोठयाप्रमाणावर लोकांची वाहतूक करण्यात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे काही दिवसांसाठी तरी रेल्वेसेवा सुरु करण्यात यावी, अशी मागणी अनेक राज्यांनी केली आहे.