मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारल्यानंतर आरे परिसरातील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात भाजपने अपेक्षेप्रमाणे आक्रमक पवित्रा घेतला आहे. आम्ही आरेतील झाडे ही काही भाजप पक्षाच्या कल्याणासाठी तोडली नव्हती, असे सांगत आमदार राम कदम यांनी आपला विरोध व्यक्त केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच मेट्रोच्या कारशेडीसाठी ही झाडे तोडण्यात आली. त्यामुळे शिवसेनेला आता पक्षाचा अजेंडा राबवण्यासाठी हा निर्णय बदलात येणार नाही. मेट्रो कारशेडचे काम थांबवणे म्हणजे मुंबईचा विकास रोखण्यासारखे आहे, अशी टीका राम कदम यांनी केली. 


भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही ठाकरे सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला. आरेतील मेट्रो कारशेडच्या उभारणीला स्थगिती दिली तर आतापर्यंत झालेल्या ७० टक्के कामाला अर्थच उरणार नाही. फडणवीस सरकारच्या काळात मुंबईच्यादृष्टीने झालेले हे अत्यंत मोठे काम आहे. 


मुंबईतील आरे मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती - उद्धव ठाकरे


आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाचा पुनर्विचार करणे म्हणजे मुंबईकरांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखे आहे. या प्रकल्पाच्या कामाला जितका उशीर होईल, खर्चात तेवढी वाढ होईल. या सगळ्याचा भुर्दंड मुंबईकरांनाच सहन करावा लागेल. त्यामुळे शिवसेनेने स्वत:च्या अहंकारापोटी मुंबईकरांचे स्वप्न अर्धवट राहून देऊ नये, असे आशिष शेलार यांनी सांगितले. 



दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मात्र ही स्थगिती फक्त कारशेडच्या कामाला असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मेट्रो प्रकल्पाचे इतर काम सुरुच राहील. कोणतीही विकासकामे रखडणार नाहीत, पण आपलं वैभव गमावून विकासकामे होणार नाहीत, असे त्यांनी ठणकावून सांगितले.