मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. मुंबईत जरी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली तरी पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यापुढे विना मास्क (Mask)बाहेर पडणे मुश्किल होणार आहे. कारण मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल (Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal) यांनी कडक निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे दंड वसूली होणार आहे. तसेच 'मास्क नाही तर प्रवेश नाही' अशी मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे मास्क हा आता बंधनकारक असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मास्क न घालता बाहेर पडाणाऱ्यांना दणका देण्याचे धोरण पालिकेने आखले आहे. दररोज २० हजार लोकांवर कारवाई करण्याचे निर्देश पालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले आहेत. आयुक्तांनी एका महिन्याचे लक्ष्य दिले असून स्वत: त्यावर लक्ष ठेवणार आहेत. सध्या मुंबईमध्ये(Mumbai)  दररोज ९५० लोक मास्क न घातलेले पकडण्यात येत आहे. त्यांच्याकडून दंडातून वसूली करण्यात येत आहे. 


कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई पालिकेकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. काही मुंबईकर मात्र, बेजबाबदारपणे मास्कशिवाय रस्त्यावर फिरत आहेत. अशा बेशिस्त, बेजबाबदार व्यक्तींमुळे कोरोनाचा धोका अधिक वाढू शकतो. त्यामुळ मुंबईत विना मास्क फिरणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी आयुक्त चहल यांनी कारवाई करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत.


दंड कमी झाला


पूर्वी विना मास्क लोकांकडून १००० रुपये दंड आकारला जात होता, जो २०० रुपयांवर आणला आहे. ९ एप्रिल ते १२ सप्टेंबर या कालावधीत ४९०० हून अधिक लोकांना मुंबईत पकडण्यात आले होते आणि त्यांच्याकडून ३३ लाख ५० हजारांहून अधिक दंड आकारण्यात आला.


त्याचप्रमाणे १३ सप्टेंबर ते १०ऑक्टोबर दरम्यान २६ हजार ५०० हून अधिक लोकांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ५३ लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला.


मुंबई महापालिकेने आतापर्यंत ३१ हजार ५०० हून अधिक लोकांना विना मास्क लोकांना पकडले असून त्यांच्याकडून ८७ लाखाहून अधिक रुपये वसूल केले आहेत. तसेच रस्त्यावर थुंकणाऱ्या १६०७ लोकांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ३ लाख ३१ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.


लोकांचे रक्षण करण्यासाठी एक उत्तम शस्त्र


कोरोनाविरूद्ध लोकांचे संरक्षण करण्यासाठी मास्क एक उत्तम शस्त्र आहे. लोकांना मास्कची सवय लावण्यासाठी, यासाठी मोहिमेची आवश्यकता आहे. रोज कोरोनाची १५०० ते २००० नवीन प्रकरणे मुंबईत येत आहेत. अशा परिस्थितीत हे पाऊल महत्वाचे आहे.