मुंबई : मुंबईत दर दिवसागणिक कोरोना रुग्णांचे आकडे अतिशय झपाट्यानं वाढत चालले आहेत. कोरोना प्रशासनाची डोकेदुखी वाढवत असतानाच आता सरत्या वर्षाच्या शेवटी या मायानगरीवर आणखी एक वक्रदृष्टी असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळं पुन्हा एकदा यंत्रणा दक्ष झाल्या आहेत. (Mumbai Coronavirus)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खलिस्तानी दहशतवादी मुंबईत काही अनपेक्षित संकटं निर्माण करु शकतात, हल्ले करु शकतात अशी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आली आहे.


वर्षाच्या शेवटच्या दिवशी सगळीकडे गोंधळाचं वातावरण असताना आणि नागरिक बेसावध असताना असा प्रकार घडणयाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळं प्रशासनानं कठोर पावलं उचलली आहेत.


दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच मुंबईतील रेल्वे स्थानकांवर पोलिसांची जास्तीची कुमक तैनात करण्यात आली आहे. शिवाय रेल्वे अधिकाऱ्यांनाही जास्त सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य आकर्षणाची ठिकाणं असणाऱ्या जागांवर अधिक दक्ष राहण्यातं आवाहन पोलीस आणि तेथल अधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे.


दरम्यान, मागील दोन दिवसांपासून काही रेल्वे स्थानकांवर पोलिसांची श्वानपथकं आणि इतर यंत्रणा सक्रिय असल्याचं पाहायला मिळत आहे.


नागरिकांनी गोंधळून न जाता यंत्रणेला सहकार्य करण्याचं आवाहनही सध्या देण्यात येत आहे.


नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण उत्साही असतानाच या उत्साहाला कोणच्याही अनुचित गोष्टीमुळं गालबोट लागू नये यासाठीच हे प्रयत्न सुरु आहेत.


मुंबईसह महाराष्ट्रात सावधगिरीचा इशारा


फक्त मुंबईत नव्हे, तर महाराष्ट्रातही सुरक्षिततेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणं टाळण्यासोबतच नागरिकांना शक्य असल्याच घरीच राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.


असं असूनही काही नागरिकांनी बाहेरची वाट धरत निर्बंध पायदळी तुडवल्यास अशांना यावेळी शासन करण्यासही यंत्रणा मागेपुढे पाहणार नसल्याचं स्पष्ट होत आहे.


सध्याच्या घडीला कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हॅरिएंटचा झपाट्यानं होणारा संसर्ग पाहता ही पावलं उचलली जात आहेत.