मुंबई : मुंबई पोलिसांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तयारी केलीय. मुंबई आणि उपनगरातल्या ३६ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. मतदान शांततेत पार पाडावं यासाठी तब्बल ४० हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत. याशिवाय २२ केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तुकड़्या, १२ सीआरपीएफच्या तुकड्या आणि २ हजार ७०० होमगार्ड तैनात करण्यात आल्या आहेत. तर ३६ मतदारसंघातले ६९ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून १६४ जणांना तडीपारीची नोटीस बजावलीय. सोशल मीडियावर पोलिसांचं विशेष लक्ष राहणार असून ड्रोनच्या माध्यमातून शहरातल्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.


मुंबईच्या वरळी विधानसभा मतदारसंघाच्या परिसरात शनिवारी संध्याकाळी एका टेम्पोमध्ये चार कोटी ३० लाख रुपयांची रोकड सापडली होती. एका टेम्पोमध्ये ही रोकड ठेवण्यात आली होती. निवडणूक आयोगाने धाड टाकून हा टेम्पो ताब्यात घेतला. यावेळी टेम्पोमध्ये पैसे असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, हे पैसे कोणाचे आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही. 


निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत राज्यात तब्बल १४२ कोटी, ७७ लाखांचं सोनं, चांदी, रोकड आणि दारू जप्त करण्यात आली आहे. यामध्ये ५२ कोटी ७० लाखांची रोकड आहे. तर, २१ कोटी रुपयांची दारुही जप्त करण्यात आली आहे.


विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास बाकी असताना महाराष्ट्रात सर्वत्र कडक बंदोबस्त तैनात केल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून ठिकठिकाणी तपासणी पथक तैनात केली असल्याचं पाहायला मिळत आहे.