मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे अखेर नवीन पक्षाची स्थापना करणार आहेत. माझ्या पक्षाचं नावं 'महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष' असणार आहे, अशी घोषणा आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बहुजन, शेतकरी, कामगार आणि तळागाळातल्या समाजाची भूमिका आम्ही मांडू आणि त्यांच्यासाठी कार्य करू असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे, तसेच देऊ तो शब्द पूर्ण करू असं आपलं ब्रीद वाक्य असणार आहे, असं देखील यावेळी नारायण राणे यांनी सांगितलं.


नारायण राणे यांची भविष्यात टीकेची तोफ शिवेसेनेवर असल्याचंही त्यांच्या बोलण्यातून दिसून आलं, कारण त्यांनी पत्रकार परिषदेआधी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.


नारायण राणे हे काँग्रेस सोडून भाजपात जाणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसपक्षाच्या सर्व पदांचे राजीनामे दिल्यानंतर नारायण राणे यांनी दिल्लीत जाऊन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली होती. मात्र चर्चा निष्फळ ठरली असावी, हे आज नारायण राणे यांनी पक्ष स्थापनेची घोषणा केल्यानंतर स्पष्ट होत आहे.