मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने (CBI) आज वरळीतून नाट्यमयरित्या ताब्यात घेतलं. 20 मिनिटांच्या चौकशीनंतर गौरव चतुर्वेदी यांना सोडण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीन चीट दिल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. या बातम्या सीबीआयच्या एका रिपोर्टच्या आधारे प्रसारित झाल्या होत्या. हा रिपोर्ट बाहेर गेला कसा याबाबतच सीबीआय तपास करत असल्याची माहिती मिळतेय. 


नवाब मलिक यांची टीका


दरम्यान, या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. 'या देशात कायद्याचे राज्य आहे की केंद्रातील राज्यकर्त्यांनी या देशात नवीन कायदा केला आहे', असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. 


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जावयाला आणि वकीलांना काही लोकांनी आज संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानाबाहेर ताब्यात घेतल्यानंतर नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 


अनिल देशमुख यांची मुलगी, सुन, जावई आणि वकील वरळी येथील निवासस्थानाबाहेर येत असताना अचानक दहा - बारा जणांनी त्यांची गाडी अडवून वकील आणि जावई यांना ताब्यात घेतलं आणि सोबत घेऊन गेले. याबाबत कुठलीही माहिती मुलीला किंवा त्यांच्या सुनेला दिलेली नाही असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. 


एकंदरीत ही सर्व कारवाई करण्यात आली ती बेकायदेशीर किंवा नियमाला धरून नाही त्यामुळे सीबीआयने तात्काळ याचा खुलासा करावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.