मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज मुंबईत येत आहेत. गडकरी नागपूरहून मुंबईला रवाना झाले आहेत. आज मुंबईत भाजपची बैठक आहे. या बैठकीत गडकरी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भाजप-सेनेमधील सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी गडकरी मुंबईत येत आहेत का? गडकरी सेनेचं मन वळवण्यासाठी मातोश्रीवर जाणार का? आणि सेनेचं मन वळवण्याचा प्रयत्न करणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीन गडकरी हे मुंबईचे आहेत. त्यांचं निवासस्थान मुंबईत आहे. त्यामुळे ते मुंबईत येत असतील. असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


दुसरीकडे संजय राऊत यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजप-शिवसेनेच्या चर्चेत कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. असं देखील शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संभाजी भिडे काल उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी भेट होऊ शकली नाही त्यावर उत्तर देताना ते बोलत होते. 


मुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावर शिवसेना ठाम असून अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव असेल तरच बोला अशी रोखठोक भूमिका संजय राऊतांनी मांडली आहे. राष्ट्रपती राजवटीच्या आडून राजकारण करणं भाजपचा डाव असून तसं करणं म्हणजे जनतेचा अपमान असल्याची टीका त्यांनी यावेळी भाजपवर केली. महाराष्ट्र राज्य दिल्लीसमोर झुकणार नाही असं त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं.