मुंबई : पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते चर्चगेट मार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित लोकल गाडीसाठी आता तीन आणि सहा महिन्यांचा पासही प्रवाशांना देण्यात येणार आहे. सध्या या वातानुकूलित लोकलसाठी एकाच महिन्याचा पास या लोकल गाडीसाठी आहे. वातानुकूलित लोकल गाडीला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर पश्चिम विभागीय रेल्वेकडून हा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. २५ डिसेंबर २०१७ रोजी पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते चर्चगेट अशी वातानुकूलित लोकल पहिल्यांदा धावली. जानेवारी २०१८ पासून विरापर्यंत लोकल फेऱ्यांचा विस्तार करण्यात आला.


वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जादा भाडे पाहता या गाडीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळेल की नाही, अशी शंका रेल्वेला होती. मात्र उकाडा वाढताच वातानुकूलित लोकल गाडीला प्रतिसाद वाढत गेला आहे. तर, वातानुकूलित रेल्वेतून चर्चगेट ते विरार या एकेरी प्रवासासाठी २०५ रुपये तिकीटदर आहे तर, एका महिन्याच्या पाससाठी २ हजार ४० रुपये आकारण्यात येतात. लोकल सेवेत आल्यानंतर आतापर्यंत १७ हजारपेक्षा जास्त प्रवाशांनी एक महिन्याचा पास, तर ८२ हजारपेक्षा जास्त प्रवाशांनी तिकीट काढलेले आहे. प्रवाशांनी पासलाही दिलेल्या पसंतीमुळे पश्चिम रेल्वेने तीन आणि सहा महिन्यांचा पासही प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. याचा प्रस्ताव पश्चिम विभागीय रेल्वेकडून तयार करून चर्चगेट येथील रेल्वेच्या मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्यानंतर तो रेल्वे बोर्डाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येईल.


रेल्वेच वेळापत्रकाचे पालन होणे आवश्यक - रेल्वे बोर्ड


दरम्यान, सर्वसामान्यांना रोज सहन कराव्या लागणाऱ्या रेल्वेच्या लेटमार्कची दखल घेत रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वेच्या कामाकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहाणी यांनी देशातील सर्वाधिक वाईट कामगिरी करणाऱ्या १० विभागांची व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेतली. यामध्ये मध्य रेल्वे विभागाचाही समावेश होता. रेल्वे बोर्डातर्फे देशातील सर्व विभागीय रेल्वेच्या वेळेबाबत पाहणी केली. यानुसार मध्य रेल्वेवरील रेल्वे उशिराने धावत असल्याचे दिसून आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथील ट्रेनचा या पाहणीत समावेश होता. मध्य रेल्वेच्या केवळ ५४ टक्के रेल्वे या वक्तशीरपणे धावत असल्याचे रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले. रेल्वेच्या विलंबाबाबत मध्य रेल्वेच्या अधिकार्यांना खडे बोल सुनावताना अध्यक्ष अश्वनी लोहाणी म्हणाले की, प्रत्येक विभागात रेल्वेचे वेळापत्रक आहे. त्या वेळापत्रकाचे पालन होणे आवश्यक आहे. वेळापत्रकानुसार रेल्वे धावण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे.