मुंबई : मुंबईत एकीकडे पावसाळ्याला एक महिना बाकी असतांना नालेसफाई वरुन जोरदर राजकारण रंगत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. असं असतांना दुसरीकडे सत्ताधारी शिवसेनेबरोबरच्या वादामुळे पावसाळ्यात सतत चर्चेत असलेल्या एमएमआरडीएनेही पावसाळ्यासाठी कंबर कसली आहे. एमएमआरडीकडे जबाबदारी असलेल्या रस्त्यांवर पाणी तुंबणार नसल्याचं एमएमआरडीएने आत्ताच जाहीर करुन टाकलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत सध्या ५ मेट्रो मार्गांची कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रोच्या कामांसाठी खोदकाम करुन ठेवले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी पावसाळ्यात गैरसोय होऊ शकते. मेट्रोची कामे सुरु असलेल्या सर्व ठिकाणी ७५ अभियंता, १५० कामगार आणि पाण्याचा निचरा करणारे ३० पंप अशी फौज पावसाळ्याचा सामना करण्यासाठी सज्ज ठेवल्याचं एमएमआरडीएने एका प्रसिद्धीपत्रकारद्वारे जाहीर केलं आहे.


तसंच २३.५ किमी लांबीच्या पुर्व द्रुतगती मार्ग आणि २५.३ किमी लांबीच्या पश्चिम द्रुतगती मार्गांच्या देखभालीची जवाबदारीही एमएमआरडीएवर आहे. या मार्गावर पाणी साचू नये यासाठी १० अभियंते, ३०० कामगार आणि १२ पाण्याचा निचरा करणारे पंप तैनात करणार असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे.