औरंगाबाद: नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांनी सोनिया गांधींची गोगलगाय करून टाकली आहे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते औरंगाबाद येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सोनिया गांधी यांची गोगलगाय करून टाकली आहे. या दोघांनी काँग्रेस पक्ष संपवून टाकला आहे. त्यामुळे आपल्याला अस्तित्वाची लढाई स्वत:च लढावी लागणार आहे, असे आंबेडकर यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी NPR, CAA, NRC या मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले. नरेंद्र मोदी या देशात जन्माला आले म्हणून त्यांना देशाचे नागरिकत्व दिले जाते. मात्र, तुमच्याकडे जन्माचा दाखला नसेल तर नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी तुम्हाला आई-वडील किंवा आजोबांचा जन्माचा दाखला दाखवावा लागणार आहे. मग आम्हालाच वेगळा न्याय का लावला जातो, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. 


काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी दिल्ली दंगलीवरूनही मोदी-शहा यांना लक्ष्य केले होते. राजसत्ता धर्मसत्तेच्या ताब्यात गेली की कारभार व्यवस्थित चालू शकत नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात जे घडलं तेच आता मोदींच्या काळात घडत आहे. दिल्लीच्या दंगलीत अनेकजण सैनिकी गणवेश परिधान करून घुसल्याचे सांगितले जाते. एका अहवालानुसार कोणीतरी २५ लाख सैनिकी गणवेश विकत घेतल्याची माहिती आहे. सरकारने या सगळ्याचा माग काढण्याची गरज आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते.