मुंबई : जमावबंदीच्या आदेशाला मुंबईकरांनी हरताळ फासल्याचे दृश्य दिसून येत आहेत. ठाण्यातून मुंबईला येणाऱ्या गाड्यांच्या चेकनाक्यावर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. करोनामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती असतानाही लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. मुलुंड चेकनाक्यावर या गाड्या पोलिसांनी अडवल्या. मात्र, यावेळी काही मुंबईकरांनी पोलिसांशी हुज्जतही घातली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात जमावबंदीचे आदेश आहेत. या आदेशाचा भंग केल्यास वाहनं जप्त करण्यात येतील असा इशारा ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिला आहे. अशीच परिस्थिती पुण्यात देखील आहे. तर नागरिकांनी गरज नसेल तर बाहेर पडू नये असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. 


रस्त्यावर गाड्यांची गर्दी पाहता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक बंद केली होती. 


रविवारच्या जनता कर्फ्यू ला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र आज मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडले आहेत. रेल्वे एसटी विमानसेवा बंद असले तरी शहरांतर्गत वाहतूक सुरू आहे. लोक खाजगी वाहनांचा वापर करत आहेत.  त्यासाठी शहरात कलम १४४ लागू करण्यात आलेल आहे. 


नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेल आहे. असं असताना शहरात गाड्या धावताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत आज दुपारनंतर शहरातील वाहतूक थांबवण्याबाबत विचार सुरू आहे. त्याबाबतचे आदेश एक क्षणी निघू शकतात.