मुंबई : शिवसेना (Shivsena) आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक 3 नोव्हेंबरला पार पडणार आहे. मात्र त्याआधीच शिवसेनेत मोठी उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळालं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले आहेत. यानंतर दोन्ही गटांनी शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरुनही मोठा वाद पेटला होता. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला धगधगती मशाल तर शिंदे गटाला तलवार आणि ढाल असे निवडणूक चिन्ह दिलंय. ठाकरे गटाने अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीसाठी रमेश लटके यांच्या जागी त्यांची पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर भाजपतर्फे मुरजी पटेल यांनी अर्ज भरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र आतापर्यंतच्या राजकारणात एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असल्यास त्या जागी इतर पक्ष उमेदवार न देता ही निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा कायम ठेवली होती. मात्र भाजपने या निवडणुकीत उमेदवार दिल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत भाजप उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उभे केल्याने पत्र लिहीत नाराजी व्यक्त केलीय.


 "प्रिय मित्र देवेंद्र, सस्नेह जय महाराष्ट्र! एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणांस लिहितो आहे. आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं," अशी विनंती राज ठाकरे यांनी केलीय.



"मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेंव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेंव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल," असे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.