मुंबई : धर्मा पाटील यांच्या मृत्युसाठी पुनर्वसन अधिकारी आणि सरकार जबाबदार आहे. अधिका-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे हे प्रकरण आता राज्य सरकारला चांगलंच महागात पडणार असल्याचं चित्र आहे. 


‘ही आत्महत्या नव्हे तर हत्या’


‘धर्मा पाटील यांना मी भेटलो होतो. त्यांच्या शेजारी ७४ गुंठे जमीन असलेल्या शेतक-याने एजंट मध्यस्थी करून पावणे दोन कोटी रूपये भरपाई घेतली. धर्मा पाटील यांनी एजंट माध्यमातून प्रयत्न केले नाही म्हणून ४ लाख पदरात पडले. ही आत्महत्या नव्हे तर हत्या आहे’, असं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलंय.


बावनकुळेंनी विष प्यावं 


शेजारच्या शेतकर्याला ७४ गुंठ्यासाठी १ कोटी ८९ लाख मिळतात, धर्मा पाटलांना २०० गुठ्यांचे ४ लाख मिळतात. हे असं कसं याची सखोल चौकशी व्हायला पाहीजे. पुनर्वसन अधिकारी भारदे आणि या कटात सहभागी असलेल्या सगळ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहीजे. सडलेली शासन यंत्रणा, कुचकामी प्रशासन, लाचखोर अधिकारी आणि त्यांना पाठीशी घालणारे मंत्री आणि सरकार हे याला जबाबदार आहे. धर्मा पाटलांचा शासन यंत्रणेनं बळी घेतलाय. चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, धर्मा पाटलांना पैसे देण्याबाबत विचार करू, आमचं म्हणणं आहे, बावनकुळेंनी विष प्यावं त्यांना मदत देण्याबद्दल आम्ही विचार करु.


पुन्हा आश्वासनांच्या पुड्या


दरम्यान, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांशी फोनवर चर्चा केली. मागण्या पूर्ण करण्याचं कुटुंबियांना त्यांनी आश्वासन दिल्याचं समजतं. त्यांना योग्य मोबदला मिळेल आणि अन्याय होणार नाही याची सरकार खबरदारी घेईल, असं बावनकुळे यांच्याकडून समजतंय.


गावक-यांवर शोककळा


शेतकरी धर्मा पाटील यांचा भुसंपदन करणाऱ्या महसूल व्यवस्थेने केलेल आर्थिक शोषण आणि लालफितीच्या कारभाराने बळी घेतला आहे. त्यांच्या गावी विखरणमध्ये या मृत्यूने शोककळा पसरली आहे. तर दोंडाईचा रस्त्यावर मोर्चा सुरू आहे.