मुंबई : शिवसेनेचा संघटनात्मक बांधणीसाठी आम्ही दौरे करतो. जे काही कार्यक्रम पूर्वनियोजित आहेत ते आम्ही करत आहोत. त्यामुळे कोणी कितीही भोंगे आपटले तरी त्याचा परिणाम आमच्या संघटनात्मक कामांमध्ये होणार नाही, असा टोला शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी लगावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रीम कोर्टाने काल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तत्काळ घेण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाला दिल्या. निवडणुकांसाठी आमची पूर्वतयारी चालूच आहेच पण आता वेगाने पावले टाकावी लागणार आहेत, असे ते म्हणाले.


शिवसेना काय आहे आणि काय नाही हे मराठी माणसाला, हिंदू समाजाला चांगलेच माहित आहे. त्यामुळे तो विचलित होत नाही. ठामपणे शिवसेनेच्या मागे उभा राहतो.


राज्यात महाविकास आघाडी एकत्र आहे. त्यामुळे आगामी महानगर पालिका निवडणूका एकत्र लढविण्याचा निर्णय लवकरच सर्व नेत्यांच्या बैठकीत घेण्यात येईल. मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक यासारख्या महापालिका शिवसेना एक हाती जिंकू शकते.


पण जिथे आमची ताकद कमी आहे अशा नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड यासारख्या महापालिका आहेत जिथे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्रित लढले तर त्याचा निश्चित वेगळा परिणाम दिसून येईल. कुठे काय आदानप्रदान करू शकतो याची शक्यता तपासून पाहू. हे तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढल्यास आघाडी सरकारला सत्तेतून खाली खेचणे कुणाच्याही बापाला शक्य होणार नाही, असा टोला त्यांनी भाजपचे नाव न घेता लगावला.