मुंबई : आम्ही धनुष्यातून बाण सोडलाय, त्यामुळे आता माघार नाही, असे सांगत शिवसेनेने स्वबळाचा नारा दिलाय.  शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एएनआयला माहिती दिली. त्यावेळी राऊत यांनी भाजपला इशाराही दिला. २०१९ ला भाजप संपलेला असेल असे सूचीत केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१९ ला भाजपचा क्लायमॅक्स असेल, अशी भविष्यवाणी शिवसेनेने केलेय. गुजरात निवडणूक हा ट्रेलर होता. राजस्थान पोटनिवडणूक मध्यांतर आहे. तर २०१९ ला भाजपचा समाप्तीचा सिनेमा पाहा, असा थेट इशारा  राऊत यांनी भाजपला दिलाय.


 स्वतंत्र लढण्याचा पुनरुच्चार


दिल्लीत काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एनडीए घटक पक्षांची बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला शिवसेनेकडून हजेरी लावण्यात आली होती. खासदार आनंदराव अडसूळ उपस्थित होते. त्यामुळे शिवसेनेने स्वतंत्र लढण्याच्या केलेल्या घोषणेचे काय, याची चर्चा होत होती. मात्र, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आम्ही स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट केलेय. धनुष्यातून बाण सुटला. तो आता मागे घेणे शक्य नाही, असे म्हणत सेना स्वतंत्र लढण्याचे पुन्हा एकदा संकेत दिलेत.


 शिवसेना स्वबळावर ठाम


गुजरात निवडणुकीत ट्रेलर पाहिला आणि आता राजस्थान पोटनिवडणुकीत मध्यांतर पाहायला मिळालेय. आता आम्ही २०१९ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या सिनेमात भाजपचा क्लायमॅक्स पाहायला मिळेल, असे राऊत यांनी म्हटलेय. २०१९ मध्ये एकट्याने लढण्यास आमच्या संकल्प केलाय. हा संकल्प मागे घेण्याचा प्रश्नच नाही. एकदा बाण धनुष्य सोडले की ते परत येत नाही, असे सांगत संजय राऊत यांनी स्वबळावर लढण्यावर शिवसेना ठाम असल्याचे स्पष्ट केले.


अर्थसंकल्पावर टीका


केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१८चा अर्थसंकल्प सादर केलाय. तो केवळ कागदावरचा आहे. प्रत्यक्षात हाती काहीही नाही. देशात आणि राज्यात शेतकऱ्यांचा प्रश्न बिकट होत आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी काहीही केलेले नाही. त्यामुळे कागदी घोडे काय कामाचे, असे म्हणत राऊत यांनी अर्थसंकल्पावर टीका केली.