मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. शनिवारी पुण्यातील कार्यक्रमात भाजपने ४८ पैकी ४३ जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. त्याच मुद्यावरुन सामनातून भाजपला खडेबोल सुनावले आहेत. सत्तेची धुंदी चढलेल्या भाजपनं पाडापाडीची भाषा न करण्याचा सल्लाही सामनाच्या संपादकीयातून देण्यात आला आहे.


'सत्ता कोणाला नको आहे? राजकारण करणार्‍या सगळ्यांनाच ती हवी आहे, पण चोवीस तास त्याच नशेत राहून झिंगणे व झिंगल्यासारखे तर्राट बोलणे हे बरे नाही. महाराष्ट्रात 48 पैकी 43 जागा जिंकण्याचा ‘तोडगा’ यांच्यापाशी आहे. जनता मरू द्या, राज्य खाक होऊ द्या, पण राजकारण टिकले पाहिजे. याला पाडू, त्याला पाडू असे सध्या सुरू आहे. याच धुंदीत उद्या हे स्वतःच कोसळतील, तरीही यांचा गिरे तो भी टांग उपर या पद्धतीने कारभार सुरूच राहील. थंडीने दवबिंदू गोठतात तसे राजकीय अतिसाराने सत्ताधार्‍यांची बुद्धी व मन गोठले आहे.' अशी सामनातून टीका करण्यात आली आहे.