मुंबई : बऱ्याच दिवसांपासून सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडींना गुरूवारी एक वेगळं वळण मिळणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसतर्फे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क म्हणजेच असंख्य शिवसैनिकांसाठी शिवतीर्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी सायंकाळी हा शपथविधी सोहळा पार पडेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क येथे विविध मान्यवरांची, राजकीय नेतेमंडळींची उपस्थिती पाहायला मिळेल. खुद्द ठाकरे कुटुंबीयांनी या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने निमंत्रणासाठी पुढे सरसावत आप्तजनांना अगत्यानं बोलावलं असल्यामुळे या शपथविधी सोहळ्यासाठी येणाऱ्यांकडेही अनेकांचं लक्ष असेल. 



दरम्यान, गुरुवारी शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्रविकासआघाडीला ३ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी सोनिया गांधींसह राहुल गांधी, अशोक गेहलोत, कमलनाथ, नितीशकुमार, ममता बॅनर्जी, केजरीवाल, के चंद्रशेखर राव आणि चंद्राबाबू यांना शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. राज्यभरातून ४०० शेतकऱ्यांनाही शपथविधीसाठी खास बोलावणं पाठवण्यात आलं आहे.


शपथविधी सोहळ्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. ज्यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाजी पार्क येथे होणारी गर्दी पाहता वाहतूक व्यवस्थेतही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. शपथविधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शिवसेना भवनालाही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. 


उद्धव ठाकरे यांनी 'सामना'चे संपादकपद सोडले


उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार..... 


एकिकडे मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान होत असतानाच दुसरीकडे राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. राष्ट्रवादीच्या जयंत  पाटील यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे. बुधवारीच तेसुद्धा आपल्या पदाची शपथ घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. या साऱ्यामध्ये आता अजित पवारांवर कोणती जबाबदारी सोपवण्यात येणार हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे.