ST Employees Salaries :  राज्यातील  एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST employees) चांगली बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वारंवार रखडत आहे. त्यामुळे उशिराने एसटी कर्मचाऱ्यांच्या हातात पैसे येतात. आता राज्य सरकारने याबाबत एक GR काढला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा आज पगार होण्याची शक्यता आहे. (Maharashtra News in Marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST employees) वेतनासाठी राज्य शासनाकडून 223 कोटी देण्यात आलेत. वेतनासाठी निधीसंबंधी राज्य सरकारकडून जीआर निघाला आहे. त्यामुळे आज एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीचा अर्धा महिना उलटला तरी एसटी कर्मचाऱ्यांचा जानेवारीचा पगार झालेला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे 1 हजार 18 कोटी रुपये मागितले होते, मात्र गुरुवारी शासनाने केवळ 223 कोटी रुपये महामंडळाला दिले आहेत. पगाराचे पैसे हवे असतील तर एसटी महामंडळाने आपला जमा-खर्चाचा हिशेब सादर करावा, अशा सूचना अर्थखात्याने महामंडळाला केल्या होत्या. त्यानुसार हे विवरण पत्र महामंडळाने अर्थखात्याला सादरही केले. मात्र, पूर्ण रक्कम देताना सरकारने हात आखडला घेतला आहे. सरकारने महामंडळाला दिलेला 223 कोटींचा निधी गुरुवारी उशिरा मिळाल्याने आज, शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार आहे.


दरम्यान, नऊ महिन्यांत पगारासह इतर बाबींवर महामंडळाचा 7 हजार 252 कोटी रुपये खर्च झाला असून तब्बल 3 हजार 228 कोटी रुपयांचा महामंडळाला तोटा झाला आहे.


पगार न झाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्याने संपवले आयुष्य


सांगली जिल्ह्यात एका एसटी कर्मचा-याने आत्महत्या करुन आपले आयुष्य संपवले आहे. वेळेवर पगार न झाल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे खरं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. भीमराव सूर्यवंशी असे एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. भीमराव सूर्यवंशी हे कवठेमहांकाळ बस आगारात चालक पदावर कार्यरत होते. आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ते अधिक चौकशी करत आहेत.


सूर्यवंशी हे कवठेमहांकाळ बस आगारात चालक म्हणून काम करत होते. न्यायालयाचा आदेश असूनही पगार वेळेत होत नसल्यामुळे एसटी महामंडळाचे कर्मचारी तणावाखाली आहेत. सूर्यवंशी देखील तणावाखाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचल्याचे बोलले जात आहे.