स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : स्मार्ट सिटी अशी नवी मुंबई शहराची ओळख आहे. नवी मुंबई महापालिकेतर्फे (Navi Mumbai Municipality) दरवर्षी मूषक अर्थात उंदीर नियंत्रणासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली जाते. मात्र, ठेकेदाराच्या अकार्यक्षमतेमुळे उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. नवी मुंबई मनपाने मागील दहा वर्षात मूषक नियंत्रणावर तब्बल 19 कोटी 44 लाख रुपयांचा खर्च केला असून पुढील वर्षात 3 कोटी 75 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, मुशक नियंत्रणाच्या नावाखाली खर्च करण्यात आलेले लाखो रुपये व्यर्थ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कारण, नवी मुंबईतील प्रत्येक विभागात उंदरांचा उपद्रव वाढत असून नागरिक यामुळे मेटाकुटीला आले आहेत. गटर, मोकळ्या जागा आणि कचऱ्याच्या ढिगात असलेले उंदीर आता नागरिकांच्या घरात घुसू लागले आहेत.


वाढत्या उंदरांच्या प्रादुर्भावामुळे आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर होत चालला आहे. बीळ बुजवणे, औषधं ठेवणे आणि उंदीर मारणे आवश्यक असताना केवळ कामाचा दिखावा करुन ठेकेदाराकडून काम केल्याचे भासवून बीलं मंजूर करुन घेतली जात असल्याचा आरोप केला जात आहे. 


यामुळे ठेकेदार मालामाल आणि सामान्य नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. तर, गेल्या दहा वर्षात पालिकेने 15 लाख 52 हजार उंदीर मारले असून, ठेकेदारा कडून दंड पोटी 31 लाख वसूल केले असल्याचे महापालिका अधिकारी सांगत आहेत. 


मेट्रोला 12 वर्ष विलंब होऊनही कंत्राटदारावर सिडको मेहरबान


नवी मुंबई मेट्रोला 12 वर्ष विलंब होऊनही कंत्राटदारावर सिडको मेहरबान असल्याचं दिसत आहे. इतक्या वर्षांच्या विलंबानंतरही सिडकोने अद्याप एकाही कंत्राटदारावर एकाही पैश्यांचा दंड आकारला नसल्याची माहिती माहितीच्या अधिकारात समोर आली आहे. विलंबामुळे मेट्रोच्या खर्चात 291 कोटींची प्राथमिक वाढ झाल्याचंही समोर आल आहे. नवी मुंबई मेट्रोचं भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होते.