मुंबईतील भाऊचा धक्का येथे एक दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. चार जण बेशुद्ध असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरु करण्यात आला आहे. निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाला का यासंबंधी पोलीस तपास करत आहेत. 


नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, यलोगेट पोलिस ठाणे हद्दीत न्यू फिश जेटी येथे मच्छीमार नौका अंजनी पुत्र (IND-MH-7-MM-1664) पहाटे 2 वाजता धक्क्यावर आणण्यात आली. किरणभाई ईश्वरभाई तांडेल (43) यांनी ही बोट आणली. बोटीतील मच्छी काढण्यासाठी सकाळी 11 च्या सुमारास एक कामगार उतरला असता तो बेशुद्ध पडला. यानंतर दुसऱ्याने धाव घेतली असता तोदेखील बेशुद्ध पडला. एकूण सहाजण यावेळी बेशुद्ध पडले होते.  


बेशुद्ध पडलेल्या सर्वांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर आंध्र प्रदेशचे निवासी बीश्रीनिवास आनंद यादव (35) व नागा डॉन संजय(बोट मालक) यांना मयत घोषित केलं. 


दरम्यान सुरेश निमुना मेकला (28) व्हेंटिलेटरवर असून इतर तिघांची प्रकृती स्थिर आहे. येलो गेट पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. दरम्यान निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना झाल्याची शक्यता असून पोलीस त्या बाजूनेही तपास करत आहेत.