मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बमुळं महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय... या लेटरबॉम्बमागं नेमकं कोण आहे? या लेटरबॉम्बचा नेमका अर्थ काय? यातून कुणाला, काय संदेश द्यायचाय? एकीकडं मुख्यमंत्री जोड्यानं मारण्याची भाषा करतात आणि दुस-याच दिवशी आघाडी तोडण्याची भाषा करणारा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब पडतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकारणात टायमिंगला फार महत्त्व असतं. काँग्रेसनं स्वबळाचा राग आळवायला सुरूवात केल्यानंतर, भाजपशी जुळवून घेण्याचा सूर लावणारं शिवसेना आमदाराचं पत्र लिक झालं... महाविकास आघाडी सरकारमध्ये काम होत नसल्यानं शिवसेना आमदारांमध्ये अस्वस्थता आहे, असा उल्लेख पत्रात आहे.


पण तेवढ्यावरून आघाडी तोडण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंना देण्याएवढे सरनाईक मोठे झालेत का? असा सवाल आता उपस्थित होतोय. मोदी-ठाकरे भेटीनंतरच सरनाईकांनी पत्र लिहिण्याचं कारण काय? प्रताप सरनाईक यांच्याआडून कुणी हे पत्र लिहून घेतलंय का?
स्वबळाची भाषा करणा-या काँग्रेसवर आणि सरकारमध्ये दादागिरी करणा-या राष्ट्रवादीवर दबाव टाकण्यासाठी शिवसेनेचीच ही खेळी आहे का? अशीही चर्चा रंगलीय.


भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विनाकारण त्रास देत आहे असं पत्रमध्ये स्पष्ट म्हटलं आहे. या त्रासातून सुटका म्हणून आपण मोदींशी जुळून घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील. सरनाईक यांच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना पक्ष आहे. असं राऊतांनी म्हटलं आहे.


दरम्यान, या लेटरबॉम्बनंतरही काँग्रेसनं स्वबळाची भाषा सुरूच ठेवलीये.  तर दुसरीकडं भाजपनंही हा शिवसेनेचा अंतर्गत मामला असल्याचं सांगत, स्वबळावर सत्ता मिळवण्याचा मनसुबा जाहीर केलाय.


सरनाईकांच्या पत्राच्या माध्यमातून शिवसेनेनं भाजपला युतीची हाक दिलीय. पण आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही शिवसेनेची राजकीय खेळी आहे की काय, याचीच चर्चा जास्त रंगलीये.