अलाहाबाद : वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या नरेंद्र मोदी यांना बुधवारी अलाहाबाद हायकोर्टाकडून दिलासा मिळालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हायकोर्टानं वाराणसी मतदारसंघातून मोदींची निवड रद्द करून तिथं नव्यानं निवडणुका घेण्यात याव्यात, ही याचिका रद्द केलीय. ठोस पुराव्यांअभावी न्यायालयानं ही याचिका रद्द केलीय. अपुऱ्या माहितीच्या आधारे ही याचिका करण्यात आल्याचं न्यायालयानं म्हटलंय.


काय होती याचिका?


पंतप्रधान मोदींच्या विरुद्ध ही याचिका काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढणाऱ्या अजय राय यांनी दाखल केली होती. २०१४ साली वाराणसी जागेवर नॉमिनेशन फॉर्मवर मोदींनी आपल्या पत्नीचं नाव लिहिलं होतं मात्र त्यांच्या संपत्तीचा उल्लेख केला नव्हता. पत्नीच्या संपत्तीच्या रकान्यात त्यांनी 'नॉट नोन' अर्थात 'माहित नाही' असा उल्लेख केला होता. 


याशिवाय मोदींनी निवडणुकीत प्रचारा दरम्यान मतदारांना पैसे आणि साड्या वाटल्या तसंच निवडणूक आचारसंहितेचंही उल्लंघन केलं असाही आरोप त्यांनी केला होता.


पंतप्रधानांकडून स्पष्टीकरण


यावर, पंतप्रधान मोदींकडून न्यायालयात स्पष्टीकरण देताना, मोदींनी खरंच आपल्या पत्नीच्या संपत्तीबद्दल काहीही माहिती नव्हती त्यामुळे त्यांनी 'नॉट नोन' असं लिहिल्याचं म्हटलं.