बंगळुरू : बंगळुरुमधील तरुणी विनयभंग प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयप्पा, राजू, चिनू आणि लियो अशी या आरोपींची नावं आहेत. हे सर्व आरोपी बंगळुरुच्या एका हॉटेलमध्ये काम करतात. बंगळुरुमध्ये नववर्षाच्या पार्टीनंतर घरी परतणाऱ्या या तरुणीचा विनयभंग केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 


भर रस्त्यात मध्यरात्री दोन नराधम तरुणीवर जबरदस्ती करत असल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. शहरातील कम्मनहळ्ळी भागात राहणारी ही तरुणी मध्यरात्री अडीच वाजता आपल्या घरी परतत होती.


रिक्षातून उतरल्यानंतर घरी चालत परतत असताना, मागून आलेल्या दोन बाईकस्वारांनी तिला अडवलं आणि तिच्यावर जबरदस्ती केली. त्यानंतर तरुणीनं आरडाओरडा केला. त्यानंतर नराधमांनी तिला ढकलून तिथून पळ काढला.


बंगळुरूत राहणाऱ्या चैताली वासनिक हिच्यासोबत ही घटना घडली... परंतु, गप्प बसून सहन करण्यापेक्षा तीनं पोलीस स्टेशन गाठून आपली तक्रार नोंदवली. त्यामुळे, ही घटना समोर येऊ शकली, यामुळे चैतालीचं कौतुक होतंय. 


दरम्यान, अशा घटनांमध्ये मुलींनीच या नराधमांना चोख प्रत्युत्तर द्यावं असं खिलाडी अक्षय कुमारने म्हटलंय. मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत असंही अक्षय म्हटलंय.